राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा विचार केला, तर अनेक कार्यकर्ते असे आढळतात की ज्यांनी कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता आयुष्यभर संघटन कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. कै. अरुण पोतदार हे अशाच कार्यकर्त्यांपैकी एक होते. साधी राहणी, शिस्तप्रिय स्वभाव, संघकार्याप्रती निष्ठा आणि कार्यकर्ते घडविण्याची अखंड तळमळ या गुणांमुळे त्यांनी अनेकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले.
अरुण पोतदार यांचा जन्म आणि बालपण मुंबईतील बांद्रा पूर्व येथील शासकीय वसाहतीत गेले. आई-वडील आणि तीन भावंडांसह त्यांचे कुटुंब तेथे वास्तव्यास होते. सन १९६८ मध्ये शालेय जीवनात असतानाच त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी परिचय झाला. त्या काळी विवेकानंद सायं शाखेचे मुख्य शिक्षक असलेले श्रीकांत धर्माधिकारी यांनी त्यांना प्रथम शाखेत आणले. तेथून सुरू झालेला त्यांचा संघप्रवास पुढील पाच दशकांहून अधिक काळ अखंडपणे सुरू राहिला.
विवेकानंद सायं शाखा, बांद्रा पूर्व ही त्यांची पहिली शाखा होती. बाल स्वयंसेवक म्हणून सुरू झालेला प्रवास पुढे गटनायक, मुख्य शिक्षक आणि विविध संघटनात्मक जबाबदाऱ्यांपर्यंत पोहोचला. त्यांच्या सुरुवातीच्या काळात माधव आपटे, रवींद्र सहस्रबुद्धे, अनंत आचार्य, हरिहर कुलकर्णी, विश्वास परब आणि रवी बेलपाठक यांसारखे उत्साही तरुण त्यांच्यासोबत कार्यरत होते. त्या काळातील त्यांच्या शाखेची २० ते २२ तरुणांची सशक्त टीम होती. त्यांच्या शाखेचे घोष पथक संपूर्ण जिल्हा आणि भागात प्रसिद्ध होते.
संघकार्याच्या विविध स्तरांवर काम करताना अरुणजींना अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन लाभले. बांद्रा शासकीय वसाहतीतील कार्यकाळात श्रीकांत धर्माधिकारी आणि विजय इनामदार यांच्यासोबत त्यांनी काम केले. खेरवाडी नगर कार्यवाह असताना सुरेश देशपांडे, सुनील खेडकर, अनंत परब, शेखर साळुंखे आणि गोपाळ चौधरी हे त्यांचे सहकारी होते. शांतीनगर भागात कार्यरत असताना जयंतराव सहस्रबुद्धे, नगीनभाई, नारायणराव बडवे, दीपक पंडित, अनंतराव पेंडसे, चंपकनाथजी आणि गिरीशनजी यांच्यासह त्यांनी संघटन कार्य अधिक बळकट केले.
नंतर पार्ले येथे स्थलांतर झाल्यावर पार्ले पूर्व नगर, पार्ले भाग आणि पुढे पार्ले विभागात त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. विमल केडिया, शरद बोडस, नानोस्करजी, गणपत रहाटे, सुधाकर बारसोडे, महेश देशपांडे, डॉ. रवींद्र खेडेकर, राजू केळकर, रवीजी किरकोळे, डॉ. देसाई, रामभाऊ गायकवाड, दिलीप पै, अनिल वर्तक आणि नारायण पालव यांसारख्या अनेक कार्यकर्त्यांसोबत त्यांचे निकटचे कार्यसंबंध होते.
अरुणजींनी संघात गटनायकापासून ते प्रांत कार्यकारिणी सदस्यापर्यंत अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. शाखेचे मुख्य शिक्षक, नगर कार्यवाह, भाग शारीरिक प्रमुख, बाल प्रमुख, बौद्धिक प्रमुख, भाग सहकार्यवाह, भाग कार्यवाह, विभाग सहकार्यवाह आणि विभाग कार्यवाह अशा विविध भूमिका त्यांनी निभावल्या. सन २००७ ते २०१६ या कालावधीत त्यांनी कोंकण प्रांत शारीरिक प्रमुख म्हणून अत्यंत प्रभावी कार्य केले. पायाच्या शारीरिक अडचणीमुळे त्यांनी ही जबाबदारी सोडली; मात्र कार्यातून निवृत्त न होता २०१६ ते २०२१ या काळात कोंकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत राहिले.
संघ शिक्षावर्गांशी त्यांचा विशेष जिव्हाळा होता. सुमारे चाळीस वर्षे त्यांनी शिक्षक म्हणून नियमितपणे संघ शिक्षावर्गांमध्ये सहभाग घेतला. नित्य प्रवास, सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि कार्यकर्त्यांशी असलेला स्नेह यांमुळे त्यांनी अनेक कार्यकर्ते घडविले. आज विविध स्तरांवर कार्यरत असलेल्या अनेक स्वयंसेवकांच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. नगर, भाग, विभाग आणि प्रांत स्तरावरील संघटनात्मक कामांनंतर त्यांनी नाना कोळी यांच्यासह कोंकण प्रांत महामार्ग कार्याची जबाबदारी स्वीकारली. राज्य महामार्गालगतच्या गावांमध्ये संघाचा संपर्क आणि कार्य वाढविण्याचे हे अभिनव कार्य होते. याशिवाय ते कोंकण प्रांत पूर्व सैनिक सेवा परिषदेमध्येही सक्रिय होते. विद्याभारतीच्या पालकत्वाची जबाबदारीही त्यांनी निष्ठेने पार पाडली.
अरुणजींच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार केला, तर त्यांची साधेपणा आणि शिस्त ही वैशिष्ट्ये विशेष ठळकपणे जाणवतात. ते कमी बोलत; परंतु जे बोलत ते नेमके आणि विचारपूर्वक असे. बाहेरून कडक भासणारे अरुणजी अंतःकरणाने अत्यंत मृदू होते. संघस्थानावर शिस्तीबाबत कोणतीही तडजोड नसली, तरी शाखा संपल्यानंतर ते सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने आणि स्नेहपूर्ण भावनेने वागत. कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हा त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग होता.
संघकार्याला भरपूर वेळ देतानाच त्यांनी कुटुंबाची जबाबदारीही तितक्याच समर्थपणे सांभाळली. नोकरी, घर आणि संघकार्य यांचा त्यांनी आदर्श समतोल साधला. नियोजनबद्ध कार्यपद्धती हा त्यांच्या स्वभावाचा स्थायीभाव होता. प्रवास असो, संघकार्य असो किंवा घरातील व्यवहार असोत, प्रत्येक गोष्ट ते व्यवस्थित आणि शिस्तबद्ध पद्धतीने करत. उत्तम स्वयंपाक करणे हा त्यांचा आणखी एक विशेष गुण होता. त्यांच्या पश्चात पत्नी नीरजा पोतदार, पुत्र अनिकेत पोतदार, सून उमा आणि नातू ध्रुव असा परिवार आहे. तसेच त्यांची तीन भावंडे आपल्या परिवारासह ठाणे येथे वास्तव्यास आहेत.
कै. अरुण पोतदार यांचे संपूर्ण जीवन हे संघकार्य, शिस्त, समर्पण आणि कार्यकर्ते घडविण्याच्या अखंड साधनेचे उदाहरण होते. त्यांनी कोणत्याही पदाचा किंवा प्रसिद्धीचा मोह न बाळगता संघकार्याला आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांच्या कार्यातून प्रेरित झालेले असंख्य स्वयंसेवक आज विविध क्षेत्रांत सक्रिय आहेत. त्यांच्या स्मृती कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणा देत राहतील आणि त्यांचे जीवन भावी पिढ्यांसाठी समर्पणाचा आदर्श ठरेल.