बोरीवली स्थानकाच्या पुनर्बांधणीसह एसी लोकल सेवांच्या वाढीसाठी आमदार संजय उपाध्याय यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

    14-Jun-2026
Total Views |
Borivali Railway Station Redevelopment
 
मुंबई : (Borivali Railway Station Redevelopment) मुंबईतील बोरीवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय उपाध्याय यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून बोरीवली रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे.
 
उपाध्याय यांनी सांगितले की, "बोरीवली स्थानक हे मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असून, येथे दररोज सुमारे ४.५ लाख प्रवासी ये-जा करतात. पंतप्रधान अमृत भारत योजनेअंतर्गत स्थानकाच्या आधुनिकीकरण व पुनर्बांधणीला मंजुरी मिळालेली असल्याने या कामाला गती देण्यात यावी."
 
याशिवाय, आमदार उपाध्याय यांनी स्वतंत्र पत्रांद्वारे पश्चिम रेल्वेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मागण्या रेल्वेमंत्र्यांसमोर मांडल्या. यामध्ये बोरीवली ते चर्चगेटदरम्यान एसी लोकल गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी प्रमुख आहे. वाढत्या प्रवासीसंख्येचा विचार करता एसी लोकल सेवांचा विस्तार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, दहाणू रोड, विरार आणि बोरीवलीदरम्यान धावणाऱ्या मेमू सेवांच्या जागी नव्या लोकल गाड्या सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
 
" मेमू गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असून, त्यामध्ये जुने रॅक असल्याने प्रकाश कमी पडतो आणि पुरेशी हवा मिळत नाही. नवीन लोकलच्या धर्तीवर गाड्या सुरू केल्यास उपनगरीय प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील. यासाठी एसी आणि नॉन-एसी डब्यांचा समावेश असलेल्या लोकल गाड्या सुरू कराव्यात ." अशी मागणी उपाध्याय यांनी केली आहे.
 
हेही वाचा :  मनोरंजनाच्या नावाखाली घृणास्पद वक्तव्य, अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही - रितू तावडे
 
आमदारांनी बोरीवली–चर्चगेटदरम्यान अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू करण्याची तसेच प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे संचालनात सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठ व शैक्षणिक केंद्रांमुळे पश्चिम उपनगरांतील मोठ्या संख्येने व्यापारी आणि विद्यार्थी दररोज नवी मुंबईकडे प्रवास करतात.
 
या प्रवासादरम्यान त्यांना अनेक ठिकाणी लोकल बदलावी लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी अंधेरी ते बेलापूर (एसी/नॉन-एसी) लोकल सकाळी ६ वाजल्यापासून सुरू करण्याबरोबरच बोरीवली ते बेलापूर (एसी/नॉन-एसी) लोकल सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार संजय उपाध्याय यांनी केली.
 
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय जाळ्यावर वाढत असलेल्या ताणाचा विचार करून प्रवासी सुविधांचा विस्तार करण्यात यावा, अशीही त्यांनी मागणी केली.
 
संजय उपाध्याय यांनी रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले की, "पश्चिम उपनगरांतील नागरिकांना कल्याणला जाण्यासाठी दादर येथे जाऊन लोकल बदलावी लागते. ही समस्या सोडविण्यासाठी बोरीवली–वसई–दिवा मार्गे कल्याणपर्यंत लोकल सेवा सुरू करण्यात यावी.या सर्व प्रस्तावांवर सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी, जेणेकरून लाखो दैनंदिन प्रवाशांना अधिक चांगल्या, सुरक्षित आणि सुलभ रेल्वे सेवांचा लाभ मिळू शकेल."
 
यापूर्वी झालेल्या भेटीदरम्यान आमदार उपाध्याय यांनी विलेपार्ले रेल्वे स्थानकावर स्वयंचलित जिने (एस्कलेटर) बसविण्याची मागणी केली होती. त्या मागणीची अंमलबजावणी सुरू झाल्याबद्दल त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. (Borivali Railway Station Redevelopment)