मुंबई : (Maharashtra Secondary Jails) राज्यातील दुय्यम कारागृहे ही सद्यास्थितीत महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली असून ती सर्व कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शुक्रवारी, महसुल व वन विभागाच्या वतीने याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
राज्यात एकूण ११६ दुय्यम कारागृहांपैकी केवळ ३६ कार्यरत असून ८० बंद अवस्थेत आहेत. कार्यरत कारागृहांची दुरावस्था आहे. दुय्यम कारागृहांच्या संदर्भात अभ्यास करुन निर्णय घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या शिफारसी विचारात घेऊन, महसूल विभागाच्या अधिनस्त असलेली सर्व दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या दुय्यम कारागृहांसाठी गृह विभागाची लिपिक संवर्गातील (वर्ग-३) एकूण ६ पदे मंजूर होती. ही पदे श्रीरामपूर (अहिल्यानगर), महाड (रायगड), मालेगाव (नाशिक), तळोदा (नंदुरबार), कराड (सातारा), उदगीर (लातूर) या ठिकाणी कार्यरत असून, सद्यस्थितीत ती रिक्त आहेत. ही पदे संबंधित कारागृह उपमहानिरीक्षक कार्यालयास वर्ग करण्यात येणार आहेत.
जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची रवानगी
सध्या दुय्यम कारागृहामध्ये दाखल असलेल्या कैद्यांची संबंधित दुय्यम कारागृह असलेल्या जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याची जबाबदारी गृह विभागावर सोपवण्यात आली आहे.(Maharashtra Secondary Jails)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....