“मुंबई ही कोळी बांधवांची आहे”; योग्य जागा किंवा पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांच्या सोबत – कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवरील कोळी बांधवांच्या प्रश्नावर तात्काळ दखल; समन्वयातून तोडगा काढण्याचे निर्देश

    12-Jun-2026
Total Views |
 
 Minister Mangal Prabhat Lodha Support Girgaon Koli Community
 
मुंबई (Lodha Supports Girgaon's Koli Community): गिरगाव चौपाटी येथे कोळी बांधवांच्या बोटी हटवण्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीची राज्याचे मंत्री व स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांनी तात्काळ दखल घेतली असून, संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
 
या संदर्भात कोळी समाजाच्या प्रतिनिधींनी श्री. मंगल प्रभात लोढा यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत, श्री. मंगल प्रभात लोढा यांनी तत्काळ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहआयुक्त तसेच मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी त्यांनी कोळी बांधवांशी समन्वय साधून सहकार्य करण्याच्या तसेच कोणतीही कारवाई करताना त्यांच्या उपजीविकेचा व परंपरागत हक्कांचा सर्वंकष विचार करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.गिरगाव चौपाटी परिसर हा मुंबईच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग असून, येथे दीर्घकाळापासून कोळी समाज आपली उपजीविका पारंपरिक पद्धतीने करत आहे. या पार्श्वभूमीवर विकासकामे आणि स्थानिकांच्या हक्कांमध्ये संतुलन राखणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. (Lodha Supports Girgaon's Koli Community)
 
 
 
यासंदर्भात श्री. मंगल प्रभात लोढा म्हणाले, “गिरगाव चौपाटीवरील कोळी बांधवांचा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे. प्रशासन आणि स्थानिक समुदाय यांच्यात योग्य समन्वय राखूनच या प्रश्नावर मार्ग काढला पाहिजे. जोपर्यंत कोळी बांधवांना गिरगाव चौपाटी येथे योग्य जागा किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत ठामपणे उभे आहोत. मुंबई ही सर्वप्रथम कोळी बांधवांचीच आहे. कोळी बांधवांची उपजीविका आणि त्यांच्या पारंपरिक हक्कांचा सन्मान राखत सकारात्मक तोडगा निघेल, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील.” (Lodha Supports Girgaon's Koli Community)
 
 
 
या प्रकरणात सर्व संबंधित घटकांमध्ये संवादातून मार्ग काढण्यास प्राधान्य देण्यात येणार असून, लवकरच यावर सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.(Lodha Supports Girgaon's Koli Community)