शक्तीपीठ महामार्गाला नाहक विरोध करण्याऐवजी सहकार्य करा; चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांचे आवाहन

    10-Jun-2026
Total Views |
Shaktipeeth Highway
 
मुंबई : (Shaktipeeth Highway) "प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांनी जनतेची नाहक दिशाभूल करून त्यांची माथी भडकवत यात पक्षीय राजकारण आणू नये. तर या भागाचा परिपूर्ण विकास होण्यासाठी चर्चा करून सहमतीने मार्ग काढावा."असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी बुधवार दि.१० रोजी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आणि भाजपा प्रदेश माध्यम प्रमुख गोविंद येतयेकर उपस्थित होते.
 
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना विरोधकांनी भान ठेऊन बोलावे, असे आ. पाटील यांनी नमूद केले.
 
"या महामार्गाच्या कामात साठ हजार कोटींचा भ्रष्टाचार होईल, असा बिनबुडाचा आरोप करीत जनतेला संभ्रमात टाकण्याचे काम सध्या केले जात आहे. पण १६ धनगरवाड्या असलेल्या या भागाचा विकास करायचा असेल तर महामार्ग हाच पर्याय आहे.
 
या अविकसित भागांचाही सहानुभूतीपूर्वक विचार झाला पाहिजे. रोजगारासाठी या भागातील तरुण-तरुणींना नाईलाजाने बाहेरच्या भागात जावे लागते. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हा प्रकल्प साकार झाल्याने हा प्रश्न मार्गी लागू शकतो." असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला.(Shaktipeeth Highway)
 
"या महामार्गामुळे महापूर येईल, शेतीचे नुकसान होईल, अशाही वावड्या उठवण्यात येत आहेत. पण असे प्रश्न लक्षात घेऊनच या प्रकल्पाची तंत्रशुद्ध आखणी सरकारकडून केली जात आहे. यापूर्वीही इतर महामार्ग उभारताना अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. पण ती व्यर्थ ठरली आणि त्या त्या भागांचा विकास झाला हे आपण अनुभवले आहे. यापूर्वीच्या सरकारने स्थानिकांचे प्रश्न सोडवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. आता राज्य सरकार पुढाकार घेत असे महत्वाकांक्षी प्रकल्प उभारत असताना शेतकऱ्यांसह स्थानिकांनी त्यास सहकार्य करत पाठींबा देणे गरजेचे आहे."अशी अपेक्षा आ. पाटील यांनी व्यक्त केली.
 
"या प्रकल्पासाठी राज्य सरकार समाजातील प्रत्येक घटकाला विश्वासात घेत आहे. शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर आपण बांधावर जाऊ, घराघरात जाऊ आणि त्यावर मार्ग काढू. पण प्रकल्पच रद्द करावा ही भूमिका अतिशय चुकीची आणि स्थानिकांचे नुकसान करणारी आहे. महामार्गाविरोधात निघालेल्या मोर्चामध्ये शेतकरी कमी आणि राजकारणी जास्त होते." असे प्रतिपादन आमदार पाटील यांनी केले.(Shaktipeeth Highway)