शांत, संयमी आणि कार्यनिष्ठ व्यक्तिमत्व

    01-Jun-2026
Total Views |
 Mukundrao Karmarkar
 
समाजकार्यासाठी झटताना स्वतःचे अस्तित्व मागे ठेवून त्या निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे कै. मुकुंदराव करमरकर. साधेपणा, संघनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि कार्यकर्तेपण यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येत होता. त्यांनी आयुष्यभर कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले.
 
कै. मुकुंदराव करमरकर यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९५० रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या आई निर्मला करमरकर आणि वडील शंकर करमरकर हे दोघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि समितीचे कट्टर कार्यकर्ते होते. त्यामुळे संघाचे संस्कार त्यांना लहानपणापासूनच लाभले. १९६३ साली त्यांचे संपूर्ण कुटुंब कर्जत येथे स्थायिक झाले.
 
घरातील वातावरण राष्ट्रभक्ती, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीने भारलेले होते. या संस्कारांचा मुकुंदरावांच्या व्यक्तिमत्त्वावर खोल परिणाम झाला. चार भावंडांमध्ये मुकुंदरावांचे व्यक्तिमत्त्व काहीसे वेगळेच होते. त्यांनी आयुष्यभर स्वतः ठरवलेल्या तत्त्वांचे आणि नियमांचे अत्यंत काटेकोर पालन केले. जीवनात शिस्त, साधेपणा आणि प्रामाणिकपणा हेच त्यांचे खरे अलंकार.
 
शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी मुंबईत पूर्ण केले. त्यानंतर आयआयटीमधून वेल्डर ट्रेडमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवत कांस्य पदक प्राप्त केले. पुढे त्यांनी एल अँड टीसारख्या नामांकित कंपनीत नोकरी स्वीकारली. मात्र नोकरी करत असतानाही त्यांनी घरातील जबाबदाऱ्या आणि सामाजिक कार्य यामध्ये समतोल राखला.
 
मुकुंदरावांचे आयुष्य हे केवळ नोकरीपुरते मर्यादित नव्हते. संघकार्य हीच त्यांची खरी जीवनशैली होती. कर्जत येथील अनंत श्रीधर ओक वनौषधी संशोधन व संवर्धन प्रतिष्ठान, नांगुर्ले या संघाच्या प्रकल्पामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. समाजातील अनेक होतकरू आणि गरजू युवकांना त्यांनी निःस्वार्थपणे नोकऱ्या मिळवून दिल्या. कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न ठेवता लोकांना मदत करणे, ही त्यांच्या स्वभावाची ओळख होती.
 
त्यांच्या कार्यातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे विद्यार्थ्यांमधील हस्ताक्षर सुधारणा अभियान. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि प्रसिद्ध हस्ताक्षर सुधारक माना लाभे यांच्या सहकार्याने त्यांनी कर्जत तालुक्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांत हस्ताक्षर सुधारण्याचे वर्ग आयोजित केले. एवढेच नव्हे, तर अलिबाग आणि नागांव परिसरातील शाळांमध्येही त्यांनी हे उपक्रम राबवले. “रेषा सरळ, उंची समान, अक्षराचा यातच प्राण” हे नानांचे ब्रीदवाक्य मुकुंदरावांनी केवळ हस्ताक्षरापुरते मर्यादित ठेवले नाही, तर आयुष्य जगतानाही त्यांनी समतोल, शिस्त आणि सौंदर्य यांचे पालन केले.
 
मुकुंदराव हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या अंगी उत्तम नेतृत्वगुण होते. ते प्रभावी वक्ते होते, तसेच उत्कृष्ट लेखकही होते. विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय विषयांवर लेखन केले. त्यांचा आवाजही अत्यंत सुमधूर होता. त्यामुळे त्यांच्या भाषणांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये एक वेगळीच प्रभावी छाप पडत असे.
 
कर्जतमध्ये संस्कार भारतीची स्थापना करून तिला नावारूपास आणण्याचे मोठे श्रेय मुकुंदरावांना जाते. भरतमुनी जयंती, गोपाळकाला, दीपावली परिवार मेळावा, गुढीपाडवा यांसारखे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी अत्यंत यशस्वीपणे आयोजित केले. संस्कार, कला आणि समाजजागृती यांचा संगम घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले.
 
समाजातील धार्मिक आणि सांस्कृतिक प्रश्नांमध्येही त्यांनी सक्रिय भूमिका घेतली. कर्जत तालुक्यातील एका मुस्लीम कुटुंबाचे मसुराश्रम येथे विधीवत हिंदूकरण घडवून आणण्यात त्यांनी पुढाकार घेतला. तसेच पनवेल येथील जनकल्याण समितीच्या पटवर्धन स्मृती रुग्णालयाच्या इमारत उभारणीसाठी निधी संकलनातही त्यांनी मोठे योगदान दिले.
 
त्यांच्या संवेदनशील आणि सेवाभावी वृत्तीची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. किल्लारी भूकंपातील जखमी नागरिक जेव्हा अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते, तेव्हा मुकुंदराव स्वतः रुग्णांची जाऊन आस्थेने विचारपूस करीत असत. दुःखात असलेल्या व्यक्तीला धीर देणे आणि मदतीचा हात पुढे करणे, हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. अनेक गरजू कुटुंबांना त्यांनी वेळोवेळी मदत केली.
 
मुकुंदराव करमरकर यांचे संपूर्ण आयुष्य हे राष्ट्रभक्ती, समाजसेवा आणि संघनिष्ठ कार्यकर्तेपणाचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांनी कधीच प्रसिद्धीची अपेक्षा केली नाही. शांतपणे, सातत्याने आणि समर्पणभावाने समाजासाठी काम करत राहणे, हेच त्यांचे जीवनधर्म होते. त्यांच्या कार्याचा प्रभाव अनेकांच्या जीवनावर आजही जाणवतो.
 
७ एप्रिल २०१४ रोजी काळाने या हाडाच्या कार्यकर्त्याला आपल्यातून हिरावून घेतले. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि संघपरिवारामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. मात्र त्यांनी केलेले कार्य, त्यांनी दिलेले संस्कार आणि त्यांनी जपलेली मूल्ये आजही अनेकांना प्रेरणा देत आहेत.
 
कै. मुकुंदराव करमरकर हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते एक विचार होते; निस्वार्थ सेवा, संघनिष्ठा आणि समाजकार्यासाठी आयुष्य समर्पित करण्याचा विचार. त्यांचे जीवन पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरेल.