बहुमत सिद्ध करा मगच मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी! जोसेफ विजय यांचा शपथविधी लांबणीवर
Thalapathy Vijay : सर्वाधिक जागा जिंकूनही मुख्यमंत्रीपदी बसण्यासाठी संघर्षच!
07-May-2026
Total Views |
नवी दिल्ली : (Thalapathy Vijay) अभिनेता चंद्रशेखरन जोसेफ विजयला सर्वात जास्त जागा मिळूनही सत्तास्थापनेसाठी संघर्ष करावा लागत आहे. अभिनेता जोसेफ विजय सलग दुसऱ्यांदा राज्यपाल राजेंद्र विश्वानाथ अर्लेकर यांना भेटण्यासाठी लोकभवन येथे पोहोचले. तासाभराच्या चर्चेनंतर ते पुन्हा परतले. मात्र, सुत्रांच्या माहितीनुसार, अद्यापही मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मार्ग खडतर दिसत आहे. त्यांना सर्वात आधी बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
राज्यपालांनी सांगितल्यानुसार, आपल्याला स्थिर सरकार हवे आहे. त्यासाठी ११८ हे बहुमत सिद्ध करावे लागेल. त्यांना ११८ आमदारांचे बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. विजयने बुधवारी ११३ आमदारांचे समर्थन पत्र दिले होते. त्यामुळेच राज्यपालांनी त्यांना ११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र मागितले. त्यानंतर अभिनेता थॉमस विजय यांनी काही वेळ मागून घेतला आहे.
२३४ सदस्यांच्या विधानसभेत थॉमस विजय यांच्या टीव्हीके पक्षाकडे एकूण १०८ जागा आहेत. थॉमस विजय स्वतः दोन जागांवर निवडून आले आहेत. त्यांना एका जागेवरून राजीनामा द्यावा लागणार आहे. असे केल्यानंतर त्यांच्या १०७ जागा राहणार आहेत. एकूण जागा २३३ असल्याने बहुमताचा आकडा ११८ इतका आहे. टीव्हीकेला ११ आमदारांचा पाठिंबा हवा आहे. काँग्रेसच्या पाच आमदारांनी त्यांना यापूर्वीच समर्थन दिले आहे. (Thalapathy Vijay)
डीएमके आणि एआयएडीएमके यांच्या सत्तास्थापनेची चर्चा?
काही स्थानिक माध्यमांमध्ये डीएमके आणि एआयएडीएमके यांच्या सरकार स्थापनेच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दोन्ही पक्षांनी मिळून टिव्हीकेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पडद्याआड चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. आणखी एका प्रस्तावावर सुरू असलेली चर्चा म्हणजे ज्यात एआयएडीएमके सरकार स्थापन करेल. त्यानंतर डीएमके त्यांना बाहेरुन पाठींबा देईल. ज्यात छोट्या पक्षांची भूमिका सर्वात जास्त असेल. मात्र, या केवळ चर्चा आहेत. याबद्दल अद्याप तरी कुठली हालचाल राजकीय पटलावर दिसून येत नाही.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलही चर्चा सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वी बिहारमध्ये सरकारच्या कॅबिनेट विस्तारच्या सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे समजते. त्यानंतर थेट प.बंगालमध्ये रवाना होतील. शाह नव्या सरकारच्या स्थापनेबद्दल आणि रणनितीबद्दल चर्चा करतील. पश्चिम बंगालमध्ये भाजपने त्यांना पर्यावेक्षक म्हणून नेमले आहे.(Thalapathy Vijay)
पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार
याच दरम्यान बुधवारी रात्री उशीरा सुवेंदु अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ (४२) यांची हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री १०.३० वाजता त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. पूर्वनियोजित कटाचा हा भाग असल्याचे बोलले जात आहे. चंद्रनाथ कोलकाता येथून मध्यमग्रामच्या आपल्या घरी खासगी वाहनाने परतत होते. यावेळी अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे. भाजपने तृणमुल काँग्रेसवर हिंसाचाराचा आरोप केला आहे.
प.बंगाल, आसाम-पुद्दुचेरीत एनडीए, केरलम् येथे काँग्रेस तमिळनाडूत टिव्हीकेची सत्ता
सोमवार, दि. ४ मे रोजी निवडणूकांचे निकाल जाहीर झाले आहेत. ज्यात आसाम आणि पुद्दुचेरीत एनडीएने आपली सत्ता राखली. प.बंगालमध्ये भाजपने एकहाती विजय मिळवला. केरळमध्ये काँग्रेस व मुस्लीम लीग प्रणीत युडीएफच्या पक्षांचा विजय झाला. तमिळनाडूच्या दोन वर्षे जुन्या पक्षाने निकालात बाजी मारली. जोसेफ चंद्रशेखर विजय यांनी विजयश्री खेचून आणत मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. (Thalapathy Vijay)