राजर्श्री शाहू महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ गिरगाव मध्ये भित्तीचित्र स्मारक उभारणार - कॅबिनेटमंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळा लॉज बंगला परिसरात जयंतीही जल्लोषात साजरी करणार; शाहू महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त मंत्री लोढा यांनी केले अभिवादन
06-May-2026
Total Views |
मुंबई : (Mangal Prabhat Lodha) राजर्श्री शाहू महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या गिरगाव खेतवाडी परिसरातील 'पन्हाळा लॉज' हा बंगला काळाच्या ओघात जमीन दोस्त झाला आहे. महाराजांच्या स्मृती जपण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला वंदन म्हणून या परिसरात महाराजांच्या कार्यासंदर्भात भित्तीचित्र स्मारक उभारणार असल्याची घोषणा कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी आज केली आहे. महाराजांच्या पुण्यतिथीनिम्मित मंत्री लोढा यांनी गिरगाव खेतवाडी येथे त्यांना आदरांजली वाहून अभिवादन केले. याप्रसंगी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना लोढा यांनी ही घोषणा केली. याच परिसरात महाराजांची जयंतीही जल्लोषात साजरी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.(Mangal Prabhat Lodha)
राजर्श्री छत्रपती शाहू महाराज यांचे गिरगाव खेतवाडी येथील पन्हाळा लॉज या बंगल्यात वास्तव्य होते. त्यांनी ६ मे १९२२ रोजी याच बंगल्यात अखेरचा श्वास घेतला होता. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या परिसरात स्मृतिस्तंभ उभारण्यात आला असून याठिकाणी कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांनी महान समाज सुधारक, सामाजिक समतेचे प्रतीक, प्रगतिशील धोरणांनी वंचितांना न्याय देणारे राजर्श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या १०४ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले. यावेळी मंत्री लोढा म्हणाले कि, महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला हा परिसर आहे. त्यांचे परंपरांना छेद देणारे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी याच परिसरात महाराजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भित्तीचित्र स्मारक उभारणार असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. मुंबई महापालिका, स्थानिक नागरिक आणि राजर्श्री छत्रपती शाहू महाराज जन्मशताब्दी समितीच्या समन्वयाने हे स्मारक उभारले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी महान समाज सुधारकांनी दाखवलेल्या मार्गावरच यशस्वीपणे राज्य कारभार करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीतच पुढील वर्षी याच गिरगाव परिसरात राजर्श्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंतीही मोठ्या जल्लोषात साजरी करणार असल्याचेही मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.(Mangal Prabhat Lodha)
राजर्श्री शाहू महाराजांचा पन्हाळा लॉज बंगला काळाच्या ओघात झाला नामशेष
गिरगाव खेतवाडी गल्ली नंबर १३ वर सन १९०० पासूनच पन्हाळ लॉज हा बंगला राजर्श्री शाहू महाराजांच्या मालकीचा होता. कोल्हापूरहून मुंबईत आल्यावर याच बंगल्यात महाराज राहत असत. तसेच शिक्षणासाठी मुंबईत असलेल्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय ही या बंगल्यात होत असे.(Mangal Prabhat Lodha)
राजर्श्री शाहू महाराजांच्या निधनानंतर करवीर दरबारने हा बंगला होमी फणीबंद या पारशी कुटुंबाला विकला. त्यानंतर या बंगल्याचे नाव फणीबंद लॉज असे झाले. त्यानंतर फणीबंद यांनी पारशी ट्रस्टला हा बंगला दिला होता. त्या ट्रस्ट कडून एका पारशी गृहस्थाने हा बंगला विकत घेऊन आपल्या पत्नीच्या नावे इदूला ईस्ट को- ऑपरेटिव्ह सोसायटी ही इमारत उभारली आजही ही इमारत गिरगाव परिसरात आहे.(Mangal Prabhat Lodha)