महायुतीचे विधान परिषदेचे जागावाटप निश्चित; भाजपा ११ जागा, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादीला २ जागा

    31-May-2026
Total Views |

Vidhan Parishad Election

मुंबई : (Vidhan Parishad Election) स्थानिक स्वराज्य संस्थातून होणाऱ्या राज्यातील १७ विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अखेर निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. या जागावाटपात महायुतीत मोठी चुरस होती. १७ पैकी ६ जागांसाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आग्रही होती.
 
या जागावाटपाच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे ही चर्चा दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत झाल्याचीही चर्चा रंगली होती. मात्र जागावाटपाचा निर्णय मुंबईतच होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. अखेरीस हे जागावाटप निश्चित झाले असून १७ पैकी ११ जागी भाजप, ४ जागी शिवसेना आणि २ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार असतील.
 
भाजप सोलापूर, जळगाव, भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, नागपूर, संभाजीनगर-जालना, अहिल्यानगर, सांगली-सातारा, नांदेड या ११ जागांवर उमेदवार देणार आहे. तर शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ या जागांवर लढेल. राष्ट्रवादीला पुणे आणि कोकण मतदारसंघ मिळाले आहेत.रायगड जागेवरती शिवसेनेने दावा केला होता पण रायगडची जागा राष्ट्रवादीला आणि पालकमंत्री पद शिवसेनेला देण्याचे ठरवण्यात आले.
 
 
रायगडसाठी राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे.नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पैकी एक जागा भाजपला हवी होती. त्यातील छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपने आपल्याकडे खेचली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री भरत गोगावले यांच्यात रविवार दि. ३१ रोजी संध्याकाळी बराच वेळ बैठक सुरू होती. तसेच मंत्री भरत गोगावले, आमदार निलेश राणे ,महेंद्र दळवी,आणि महेंद्र थोरवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.रायगडची जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर ही बैठक पार पडली.(Vidhan Parishad Election)