काँग्रेस सत्तेत आल्यावर...

    28-May-2026   
Total Views |
 
Kerala Waqf Board Dispute
 
२०२५ साली त्या ४०४ एकर जमिनीचा ‘वक्फ बोर्ड’चा दावा केरळम् उच्च न्यायालयाने फेटाळला होता. ‘हे जमीन हडपायचे कारस्थान आहे,’ असेही तेव्हा न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर ‘वक्फ’समर्थक सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती आणली. याचाच अर्थ, या जमिनीसंदर्भाचा सर्व दावा हा न्यायप्रविष्ट आहे. या जमिनीबाबत कुणीही काहीही व्यवहार करू शकत नाही. मात्र, काँग्रेस आणि ‘मुस्लीम लीग’चे सरकार केरळम्मध्ये सत्तेत येताच, ‘वक्फ बोर्डा’ने ‘उम्मीद’ या राष्ट्रीय रेकॉर्डमध्ये ४०४ एकर जमिनीचे सर्वेसर्वा असल्याचा दावा केला. केरळम्मध्ये काँग्रेससह ‘मुस्लीम लीग’ सत्तेत आली म्हणून ‘वक्फ’ची ही हिंमत झाली, हे सत्यच. त्यामुळे केरळम्मध्ये काँग्रेस का आणि कशासाठी जिंकली? याचे उत्तर सर्व हिंदूंना आणि सर्व मुस्लिमांनाही मिळाले आहे.
 
खरेतर मुनबंम गावात ४०४ एकर जमिनीवर ६००पेक्षा जास्त हिंदू किंवा ख्रिश्चन कुटुंबे पिढ्यान्पिढ्या वास्तव्यास आहेत. मात्र, ‘वक्फ बोर्डा’ने या जागेला ‘वक्फ’ची मालमत्ता सांगितले. बोर्डाने सांगितले की, १९५० साली मोहम्मद सिद्दीकी सैद याने ही जमीन ‘वक्फ बोर्डा’ला दिली होती. पण, पिढ्यान्पिढ्या लोक या जमिनीवर राहत होते. हा मोहम्मद सैदला कोणी या जमिनीचे मालक बनवले? यावरून ती ६०० कुटुंबे रस्त्यावर उतरली. निवडणुकीपूर्वी काँग्रेस सरकारने जाहीर केले की, ‘आम्ही सत्तेत आलो तर हा प्रश्न दहा मिनिटांत सोडवू. मात्र, केरळम्मध्ये काँग्रेसची सत्ता आल्या-आल्या ‘वक्फ बोर्डा’ने ‘उम्मीद’ पोर्टलवर स्वतःला या ४०४ एकर जमिनीचे ‘मुतवल्ली’ म्हणजे सर्वेसर्वा घोषित केले. यावर त्या ६०० कुटुंबांचे प्रतिनिधित्व करणार्‍या ‘मुनबंम भूमी संरक्षण समिती’ने मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांच्याकडे मागणी केली की, केरळम्मधला ‘वक्फ बोर्ड’ त्वरित विसर्जित करा, समाप्त करा. आता काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि मुख्यतः काँग्रेस काय करणार? कारण, केरळम्मध्ये काँग्रेसचा सहयोगी पक्ष आहे ‘मुस्लीम लीग.’ ‘मुस्लीम लीग’ कधीही ‘वक्फ बोर्डा’च्या विरोधात जाणार नाही. त्यामुळे काँग्रेसलाही ‘वक्फ बोर्डा’ला विरोध करणे शक्यच नाही. केरळम् आद्यगुरू शंकराचार्यांची ही भूमी. हिंदू समाजाचा देदीप्यमान इतिहास लाभलेल्या या केरळम्मध्ये हिंदूंवर अशी वेळ यावी? काँग्रेस सत्तेत आल्यावर दुसरे काय होणार म्हणा!
 
कुठलाही ‘शॉर्टकट’ नसतो!
 
नुकतीच डोंबिवली येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून आदर्श म्हात्रे या नालायकाने तरुणींशी संपर्क साधत, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर त्या तरुणींच्याच नावावर लाखो रुपयांचे कर्ज काढून ते पैसे लाटून तरुणींना फसवून पोबाराही केला. त्याने अशाप्रकारे तब्बल १४० तरुणींना फसवले. या घटनेतील पीडित मुलींबाबत वाईट वाटते. पण, ‘लॉट’मध्ये फसणार्‍या या मुली ज्या पद्धतीने फसल्या त्यातून अनेक प्रश्न उपस्थित होतात.
 
जसे तरुणींना सुरुवातीलाच याबाबत त्यांच्या कुटुंबाला, जवळच्या नातेवाईकांना सांगावे असे वाटले नाही? शोषण होत असताना त्यांच्या मानसिकतेमध्ये, वर्तनामध्ये बदल झाला असणारच. हा बदल तरुणींच्या घरातल्यांना जाणवला नाही का? दुर्दैवाने नातेसंबंध-मैत्री यांमध्येही जेवढ्यास तेवढे आणि मतलबापुरते संवाद साधण्याची भयंकर परिस्थिती समाजात उद्भवली आहे. त्यामुळेच तर याच नव्हे, तर अनेक तरुण मुली अशाच प्रकारे फसत असतात. पण, त्यांच्या घरातल्यांना याबाबत पत्ताच नसतो. दुसरीकडे या मुलींनाही घरातल्यांशी याबाबत बोलावे असे वाटत नाही. हरवलेल्या संवादामुळे कुटुंबातले नातेच हरवत चालले आहे. फसलेल्या शेकडो महिलांशी संवाद साधलेला आहे. त्यातून कळले की, त्या आपुलकीच्या गोड शब्दांच्या भुकेल्या होत्या. त्यांच्या वाटेला कधी मनापासूनचे दोन गोड शब्द, मायेने घेतलेली काळजी आलेली नव्हती. त्यातच सिनेमात-माध्यमांवर त्यांनी पाहिले होते की, हिरो हिरोईनची किती काळजी घेतो. हिरो हिरोईनशी अवास्तव मानसिक-लैंगिक संबंध ठेवतो.
 
मानसिकदृष्ट्या त्या एकट्या होत्या. हेच हेरून नराधमांनी त्यांना फसवले. वर कष्ट न करता, ऐशोआरामाचे आयुष्य जगायची संधी मिळेल, सगळी भौतिक सुखे हात जोडून उभी राहतील, ही खोटी स्वप्ने त्यांना दाखवली गेली. महिलांच्या विश्वासाची आणि प्रेमाची परतफेड म्हणून नराधमांनी या महिलांचे स्वत्व, अवघे जगणे ओरबाडले. त्या १४० फसलेल्या महिलांच्या बाबतीत असेच घडले का? आयुष्यात ‘शॉर्टकट’ नसतोच; ना श्रीमंत होण्यामध्ये, ना विश्वास आणि प्रेम मिळवण्यामध्ये, हे सत्य भोळ्या मुलींना कधी कळेल?
 
९५९४९६९६३८




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.