राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनीसोबत सामंजस्य करार;पुण्यात ४०० कोटींची गुंतवणुक; १० वर्षात एक हजार रोजगार निर्मिती

    25-May-2026   
Total Views |
Maharashtra Industrial Policy
 
मुंबई : (Maharashtra Industrial Policy) राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला असून पुण्यात पुढील १० वर्षांत सुमारे ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे एक हजार थेट रोजगार निर्मिती होणार आहे. त्यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या सामंजस्य करारावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगण, गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, अग्रेको इंडियाचे संचालक सन्नी ठकरार, ग्रुप प्रमुख स्टीफन रेआ, व्यवस्थापकीय संचालक राहुल खरे उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पुणे आता ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सचे महत्त्वाचे केंद्र बनत असून या जीसीसी कॅपिटलमध्ये अग्रेको कंपनीचे स्वागत आहे. भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळेल.(Maharashtra Industrial Policy)
 
 
पुणे येथील प्रकल्पासाठी शासनाकडून आवश्यक परवानग्या, नोंदणी, मंजुरी, सवलती आणि अन्य प्रशासकीय बाबींमध्ये विद्यमान धोरणांनुसार सहकार्य करण्यात येणार आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागांच्या माध्यमातून या गुंतवणुकीला गती देण्यात येणार आहे."
 
अग्रेको इंडिया ही कंपनी ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना या क्षेत्रात कार्यरत आहे. आज झालेल्या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी व उत्पादन केंद्र उभारणार असून त्याचे काम यावर्षी मध्ये सुरु होणार आहे. हे केंद्र स्कॉटलंडबाहेरील ॲग्रेकोचे सर्वात महत्त्वाचे जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र असेल.
 
या प्रकल्पामुळे स्थानिक पुरवठा साखळीला मोठी चालना मिळणार असून, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना जागतिक पुरवठा साखळीशी जोडण्याची संधी उपलब्ध होणार आहे; तसेच अत्याधुनिक उत्पादन, ऊर्जा उपकरण निर्मिती आणि प्रिसिजन इंजिनिअरिंग क्षेत्रात महाराष्ट्राची क्षमता अधिक मजबूत करण्यास हातभार लाभणार आहे.(Maharashtra Industrial Policy)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....