काँग्रेसने स्वतःच्या नगरसेवकांचा शोध घ्यावा; महायुती १७ जागा जिंकणार; महायुतीच्या जागावाटपाबाबत ९९ टक्के जागांवर एकमत-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    25-May-2026
Total Views |
Chandrashekhar Bawankule
 
नागपूर : (Chandrashekhar Bawankule) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पूर्व विदर्भातील काही नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ असल्याच्या चर्चेवरून राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसने स्वतःच्या नगरसेवकांचा शोध घ्यावा, असा टोला लगावत महायुती सर्व १७ जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
नागपुरात सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसचे नगरसेवक कुठे गेले, याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. त्यांच्या पक्षातील नेत्यांनीच त्याबाबत विचार करावा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील काँग्रेस नगराध्यक्ष गायब असल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यांनीच आपल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा शोध घ्यावा.
 
 
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीची ताकद स्पष्ट असल्याचा दावा करताना बावनकुळे म्हणाले की, नागपुरात सुमारे ८०० मतांपैकी जवळपास ६०० मते भाजप- महायुतीकडे आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी असून महायुती सर्व १७ जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Chandrashekhar Bawankule)
 
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी निवडणुकांमधील खर्च कमी करण्याचे आवाहन केले असल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले की, निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवास, प्रचार, वाहनांचा वापर आणि इंधन खर्च होतो. त्यामुळे संख्याबळ स्पष्ट असेल, तर निवडणूक बिनविरोध व्हावी. यासाठी ते शरद पवार, उद्धव ठाकरे तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
विधान परिषद उमेदवारीसंदर्भात अरुणजी लखानी यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की, भाजपची यादी केंद्रीय समितीकडे पाठविण्यात आली असून अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. जय पवार यांच्या नावाबाबतचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशाचा प्रचंड विश्वास असल्याचे सांगताना बावनकुळे म्हणाले की, विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी जनतेचा मोदींवर विश्वास आहे. जोपर्यंत जनतेचा पाठिंबा आहे, तोपर्यंत मोदी देशाचे नेतृत्व करत राहतील.महायुतीच्या जागावाटपाबाबत ९९ टक्के जागांवर एकमत झाले असून केवळ एका जागेचा प्रश्न बाकी असल्याची माहितीही त्यांनी दिली.
 
काँग्रेसने मोदींना ‘महागाई मॅन’ म्हटल्याच्या प्रश्नावर त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत, काँग्रेस हा जनतेचा विश्वास गमावलेला पक्ष असून नकारात्मकता निर्माण करून संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली.
 
पेट्रोल-डिझेल टंचाईबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, सुरुवातीला काही पेट्रोल पंप चालकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत. योग्य नियोजनामुळे पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Chandrashekhar Bawankule)