आय. पी. एल.प्रसारणामधील “सलाम मुंबई” ऐवजी “नमस्कार मुंबई” प्रदर्शित करण्याची भाजयुमो, मुंबई अध्यक्ष दिपक सिंह यांची मागणी
24-May-2026
Total Views |
मुंबई: (Deepak Singh) भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष दिपक सिंह यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांना पत्र लिहून आय.पी.एल सामन्यांदरम्यान स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात येणाऱ्या “सलाम मुंबई” या घोषणेवर तीव्र व गंभीर आक्षेप नोंदवला आहे.
दिपक सिंह (Deepak Singh) यांनी रविवार दि.२४ रोजी या संदर्भात अजिंक्य नाईक यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "मुंबईची संस्कृती आणि ओळख “सलाम मुंबई” नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेशी सुसंगत “नमस्कार मुंबई” अथवा “नमस्ते मुंबई” अशी असली पाहिजे. त्यामुळे “सलाम मुंबई” हा शब्दप्रयोग तात्काळ बंद करून त्याऐवजी “नमस्कार मुंबई” किंवा “नमस्ते मुंबई” या शब्दांचा वापर करण्यात यावा."(Deepak Singh)
दिपक सिंह यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे की,"मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून महाराष्ट्राची भाषा, गौरवशाली संस्कृती आणि परंपरा जपणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. सार्वजनिक मंचांवर महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान राखला गेला पाहिजे.
त्यांच्या मते “सलाम” या शब्दाऐवजी “नमस्कार” किंवा “नमस्ते” हे शब्द महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक भावनांचे अधिक योग्य प्रतिनिधित्व करतात.मुंबईचे नामकरण मुम्बादेवी यांच्या नावावरून झाले असून या शहराची ओळख तिच्या मूळ सांस्कृतिक संदर्भातच मांडली गेली पाहिजे.भविष्यात आय पी एल किंवा इतर कोणत्याही क्रिकेट सामन्यांदरम्यान “सलाम मुंबई” ऐवजी “नमस्कार मुंबई” अथवा “नमस्ते मुंबई” यांना प्राधान्य द्यावे."(Deepak Singh)
भाजयुमो मुंबई अध्यक्षांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनने या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष द्यावे आणि भविष्यात आय पी एल किंवा इतर कोणत्याही क्रिकेट सामन्यात “सलाम मुंबई”सारख्या घोषणांचे प्रसारण पूर्णतः बंद करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
तसेच मोठ्या स्क्रीनवर “जय महाराष्ट्र”सारखे संदेश प्रदर्शित केल्यास महाराष्ट्राच्या अस्मिता आणि जनभावनांचा अधिक योग्य सन्मान होईल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. जनभावनांचा आदर राखत याबाबत तातडीने सकारात्मक आणि योग्य निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.(Deepak Singh)