रिपब्लिकन पक्षाचे नॅशनल पार्क गेटवर जीत आठवले यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन

    22-May-2026
Total Views |
Wildlife Rescue Centre
 
मुंबई : (Wildlife Rescue Centre) बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये वन्यप्राण्यांसाठी रेस्क्यु सेंटर उभारण्यात आले आहे. या रेस्क्यु सेंटरमध्ये वन्यप्राण्यांना दत्तक घेण्याची योजना सुरू आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दत्तक घेतलेला बिबळया वाघ 17 मे रोजी मृत्यू पावला. यापूर्वी त्यांनी दत्तक घेतलेला भीम हा पँथरही या रेस्क्यु सेंटरमध्ये मृत्यू पावला होता. या रेस्क्यु सेंटरमध्ये अनेक प्राणी मृत्यू पावत असल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाने केला आहे.
 
वन्यप्राण्यांच्या मृत्यूसंदर्भात चौकशी न झाल्यास रेस्क्यु सेंटरला टाळे ठोकण्याचा इशारा रिपब्लिकन पक्षाचे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी दिला आहे.
 
रेस्क्यु सेंटरमध्ये वन्यप्राण्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करीत रिपब्लिकन पक्षाने आज बोरीवली येथील नॅशनल पार्कच्या प्रवेशद्वारावर टाळे ठोका आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे सुपुत्र कुमार जीत आठवले यांनी केले. या आंदोलनात उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, दहिसर तालुका अध्यक्ष दिलीप व्हावळे, ॲड. अभयाताई सोनवणे, मुंबई अध्यक्षा उषताई रामलु, हरिहर यादव आदींनी सहभाग घेतला.
 
हेही वाचा :  संयुक्त राष्ट्रसंघात भारताकडून पाकिस्तानची बोलती बंद! दहशतवादाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा जोरदार फटकारले
 
वन्यप्राण्यांच्या मृत्यूबाबत सखोल चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे दहिसर तालुका अध्यक्ष दिलीप व्हावले यांनी केली आहे. वन्यप्राण्यांच्या मृत्यूसंदर्भात चौकशी करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांबरोबरच तज्ञ डॉक्टर आणि स्थानिक पोलीसांचाही समावेश करावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे.
 
मुख्य वनसंरक्षक अनिता पाटील यांनी स्थानिक पोलीसांना समितीमध्ये घेण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले. नुकताच मृत्यू पावलेल्या बिबळया वाघाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मंगळवारी येणार असून त्यानंतर निष्काळजी झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्य वनसंरक्षक अनिता पाटील यांनी दिले.(Wildlife Rescue Centre)