दीड वर्षापूर्वीच संपूर्ण तुतारी पक्ष रिकामा झाला असता - उमेश पाटील
21-May-2026
Total Views |
मुंबई : (Tutari Party) "दीड वर्षापूर्वीच संपूर्ण तुतारी पक्ष रिकामा झाला असता.तुतारीचे एक आमदार आणि खासदार सोडले तर बाकी सर्व आमच्याकडे येण्यास उत्सुक होते. एवढेच नाही तर त्यापैकी काही जणांनी पक्षांतराच्या अर्जावर सह्या देखील केल्या होत्या.त्यानंतर त्यांच्या नेत्यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यासमोर आकांडतांडव केला होता. त्यामुळे अजितदादांनी तो प्रस्ताव बाजूला ठेवला होता.
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत सत्ताधारी पक्षाचे आमदार फुटले आहेत आणि विरोधी पक्षात सामील झाले असे आज तागायत घडले नाही आहे.त्यामुळे आमच्या पक्षाचे आमदार त्यांना भेटले ही पूर्णतः खोटी बातमी आहे.आमच्या पक्षाच्या आमदारांनी एकसंघपणे सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात आमच्या पक्षाचे कामकाज अतिशय व्यवस्थित सुरू आहे."असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी गुरुवार दि.२१ रोजी केले.
"जोपर्यंत अजितदादा पवार हयात होते. तोपर्यंत शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी द्वेषपूर्ण वक्तव्य अनेकवेळा अजितदादांविषयी केली होती.अजितदादांना मानणारा जो महाराष्ट्रातला वर्ग आहे त्या सगळ्या फॉलोवर्सचे आकर्षण स्वतःभोवती केंद्रित करणे आणि अजितदादांचा वारसा स्वतःभोवती आहे हे दाखवणे यासाठी रोहित पवार यांचा अट्टाहास सुरू आहे." असेही उमेश पाटील म्हणाले.