मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मालवणी येथील स्थानिक नगरसेवक आणि आमदाराच्या आशीर्वादानेच अनधिकृत बांधकामाला खतपाणी मिळत असून स्थनिकांवर दबावतंत्राचा वापर करून बांगलादेशींना आश्रय दिला जात असल्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले. भू-माफियांचा आणि अनधिकृत बांधकाम करणारे हिंदू समुदायावर अन्याय करत असून आता हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, तर त्यांना सडेतोड उत्तर देणार असल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.
बांगलादेशींची अनधिकृत बांधकामं देशाच्या सुरक्षेला धोका असून त्या विरोधात संघर्ष सुरूच राहील असेही लोढा यांनी सांगितले. मालवणी परिसरातील सावरिया मशीद येथे रागिणी रमाशंकर चौरसिया या महिलेचा घरचा दरवाजा बंद करून अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. त्या पीडित महिलेची भेट घेतल्या नंतर मंत्री लोढा पत्रकारांशी संवाद साधला.
मालवणी अब्बासिया कंपाऊंड येथे राहणारी रागिणी रामशंकर चौरसिया या महिलेच्या घराला लागूनच शौकत हुसेन आबिद हुसेन सैय्यद यांनी अनधिकृत बांधकाम केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीतर चौरसिया कुटुंबीयांना त्यांनी घरचा दरवाजा बंद करण्यास भाग पाडले. स्थानिक हिंदू संघटनांनी याबाबत आवाज उठवला होता. मात्र प्रकरण पोलिसात गेल्यानंतर ते बांधकाम अनधिकृतच असल्याचे निष्पन्न झाले. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हा विषय गांभीर्याने घेतला असून त्यांनी त्या पीडित महिलेची भेट घेतली तसेच मालवणी पोलिस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्याकडे कडक कारवाईची मागणी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवून सर्वांना सुरक्षित वातावरण निर्माण केले आहे. तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात गृह विभाग अतिशय प्रभावीपणे कार्यरत आहे. या राज्यात हिंदू समुदायावरील अत्याचार सहन केला जाणार नाही, तर आरोपींवर कडक कारवाई होईल की, कुणाचेही हिंदू समुदायावर अन्याय करण्याचे धाडस होणार नाही, असा इशाराच असा इशाराच यावेळी मंत्री लोढा यांनी दिला.
स्थानिक आमदार असलम शेख यांचे नगरसेवक पुत्र हैदर शेख यांनीच अब्बासिया कंपाऊंड येथे रस्त्यावर अवैध छबील (पाणपोई) बांधकामाचे उद्घाटन केले होते. कोणतीही परवानगी नसताना ६ फूट बाय १२ फूट लांबी-रुंदीचे सिमेंट-विटांचे बांधकाम तब्बल १४ फूट उंचीपर्यंत वाढवण्यात आले, यासाठी ६ लोखंडी खांब उभे करण्यात आले होते. यावर महापालिकेने कारवाई केली असून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर ही फौजदारी कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.