
तरणोपाय नाही
रांचीमध्ये एका महिलेची हत्या झाली. असे तर जगभरात विविध कारणांसाठी हत्या होतातच. पण, तिची हत्या कोणी केली? अर्थात, थ्रिलर किंवा सनसनाटीच्या दृष्टीने या बातमीकडे लोक पाहतीलही. पण, या बातमीचे सर्वात विदारक सत्य असे आहे की, तिच्या अल्पवयीन लेकीनेच तिची हत्या केली. कारण काय, तर अरबाज खानसोबत तिला आताच्या आता ‘निकाह’ करायचा होता. त्यासाठी तिला अरबाजने सांगितले होते की, खूप पैसे लागणार असून, ते आईकडून माग. पण, मुलीच्या आईने पैसे तर दिले नाहीतच; वर तिला ‘निकाह’ होऊ देणार नाही, असेही निक्षून सांगितले.
रागाच्याभरात मग त्या मुलीने आणि अरबाजने, त्या महिलेची थंडपणे हत्या केली. ही कसली नशा? जन्मदात्या आईबद्दलचेही प्रेम आटले? पैसे दिले नाहीत म्हणून हत्या? अशा अनेक घटना आज समाजात घडत आहेत. कुठे आईने दारूला पैसे दिले नाहीत, म्हणून अल्पवयीन मुलाने आईला मारले, तर कुठे बापाने अपमान केला म्हणून बापाची हत्या केली. कुठे तर आई किंवा बापाने क्षुल्लक कारणावरून, पोटच्या मुला/मुलींचा खून केल्याच्याही घटना घडत आहेत. समाजात हे असे का व्हावे? नात्याची वीण अशी का विषारी व्हावी? मुलांना व्यसनाच्या आणि मुलींना प्रेमाच्या आड इतकी कशी भूल पडते? काहीच दिवसांपूर्वी आयुष्यात आलेला मुलगा, हा आईबाबांपेक्षाही जवळचा कसा होतो? यात जादूटोणा-करणी केल्याचेही म्हटले जाते. पण, अशी खूप प्रकरणे हाताळल्याने खात्री पटली की, असे काही नसते. तर, मुलींच्या मनाचा अभ्यास करून, त्या-त्या पॅटर्ननुसार खेळले जाते. अवास्तव काल्पनिक, फिल्मी पद्धतीच्या प्रेमाची हमी मुलींना दिली जाते. इतरांना तिच्यात काहीच गुण दिसत नसतील आणि भले ती मुलगी अवगुणी असली, तरीसुद्धा त्या मुलीला हे फसवे लोक सांगतात की, जगात तिच्यासारखी रूपवती-गुणवती कुणीच नाही. सगळे खोटे असते आणि त्या खोट्याच्या जाळ्यात मुलींना फसवले जाते. तर मुलांना नशेच्या बाजारात गुंतवले जाते. भारतीय समाजातील युवा पिढीला बरबाद करण्याचे, हे समाजविघातक शक्तींचे कारस्थान असू शकेल. त्यामुळेच संस्कारित पिढी घडवण्याचे शिवधनुष्य प्रत्येक आईबाबांना, कुटुंबाला उचलावेच लागणार आहे. त्याशिवाय, तरणोपाय नाही!
9594969638