कांजूर घनकचरा प्रकल्पाची आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडून आकस्मिक पाहणी; दुर्गंधी नियंत्रणासाठी उपाययोजनांना गती

    13-May-2026
Total Views |
ashwini bhide
 
मुंबई : (Kanjur Solid Waste Project) कांजूरस्थित नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून दुर्गंधी निर्माण होऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची महानगरपालिका आयुक्त  अश्विनी भिडे यांनी आज पहाटे आकस्मिक भेट देत पाहणी केली. सुमारे दीड तास प्रकल्प स्थळाची पाहणी करत घनकचरा व्‍यवस्‍थापन प्रकल्पातील विविध कामकाजाचा आढावा घेतला.तसेच, आवश्यक सुधारणा व कार्यक्षमतेबाबत निर्देश दिले. प्रारंभी श्रीमती भिडे यांनी कचरा विलगीकरण केंद्र, खतनिर्मिती प्रकल्प स्थळ, वायुपासून वीजनिर्मिती केंद्र आणि बायो रिऍक्टर लँड फील या ठिकाणाना भेट दिली.

<!-- Inject Script Filtered -->
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्‍थळाच्‍या आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना दुर्गंधी येऊ नये, यासाठी घनकच-यावर ' बायो-एंझाइम'चा समावेश असलेल्या द्रव्याची फवारणी केली जाते. तसेच, कचरा स्वीकारण्यात येणा-या ठिकाणाच्या आजूबाजूला सुगंधी द्रव्याची फवारणी करण्याकरीता 'मिस्टींग'ची व्यवस्था करण्‍यात आली आहे. प्रकल्पस्‍थळी 11 ठिकाणी सुगंधी द्रव्य फवारणीसाठी 'मिस्टींग' कॅननची यंत्रणा कार्यान्वित आहे. त्‍याची देखील  भिडे यांनी पाहणी केली. तसेच, सभोवतालच्या परिसरातून येणाऱ्या दुर्गंधीबाबत तक्रारीसाठी मदत सेवा क्रमांक (हेल्पलाईन) कार्यान्वित करण्‍यात आला आहे. त्‍याचादेखील आढावा त्‍यांनी घेतला. (Kanjur Solid Waste Project)
 
हेही वाचा :  रस्त्यावरून चालणाऱ्या सर्वच गाड्या आमच्या ताफ्यातील भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न - अमीत साटम;अमीत साटम यांचे रोहित पवार यांना प्रत्युत्तर
 
कांजूर येथे एकूण ११८. १४ हेक्‍टर जमीनीवर (सुमारे 292 एकर) नागरी घनकचरा व्‍यवस्‍थापन प्रकल्‍प राबविला जात आहे. सद्यस्थितीत प्रति‍ दिन सुमारे 5200 दशलक्ष टन नागरी घनकच-यावर शास्‍त्रोक्‍त पद्धतीने बायोरिऍक्‍टर तंत्रज्ञानाद्वारे आणि १००० दशलक्ष टन नागरी घनकच-यावर खत निर्मिती तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया करण्‍यात येत आहे.
 
नागरी घनकचऱ्यापासून निर्माण होणा-या मिथेन वायुपासून काही प्रमाणात वीज निर्मिती होते. ही वीज याच प्रकल्पासाठी वापरण्यात येते. उर्वरीत मिथेन वायू हा शास्त्रोक्त पध्दतीने जाळण्यात येतो. नागरी घनकचऱ्याचा हवेशी संपर्क होऊ नये व दुर्गंधी पसरू नये तसेच निर्माण होणारा वायू हवेत पसरू नये, याकरीता कचऱ्यावर मातीचे आवरण टाकण्यात येते, त्‍याची भिडे यांनी पाहणी केली. तसेच, आवश्‍यक ते निर्देश दिले. उपायुक्‍त ( महानगरपालिका आयुक्‍त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्‍त (घनकचरा व्‍यवस्‍थापन) श्री. किेरण दिघावकर आदी उपस्थित होते. (Kanjur Solid Waste Project)