धारावी पुनर्विकासातून १.५ लाख घरांचे स्वप्न;‘लाइव्ह-वर्क’ संकल्पनेवर भर

Total Views |
Dharavi Mumbai Redevelopment
 
मुंबई : (Dharavi Mumbai Redevelopment) आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी केंद्र सरकारच्या गृहनिर्माण ध्येयपूर्तीसाठी देशात जवळपास एक कोटी परवडणाऱ्या घरांची आवश्यकता असल्याचा अंदाज आहे. महाराष्ट्राने सामुहिक पुनर्विकास, झोपडपट्टी पुनर्वसन आणि मोठ्या सार्वजनिक-खासगी पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून या दिशेने वेगाने पावले उचलली आहेत.
 
ही व्यापक नियोजनाची संकल्पना आता धारावी पुनर्विकास प्रकल्पासारख्या महत्त्वाच्या योजनांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. जगातील सर्वाधिक दाट लोकवस्ती असलेल्या अनधिकृत वसाहतींपैकी एक असलेल्या धारावीचे रूपांतर करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
 
धारावी प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या मते, या योजनेचा हेतू केवळ झोपड्यांच्या जागी उंच इमारती उभारणे एवढाच नाही. रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था, वाहतूक सुविधा, शाळा, रुग्णालये, खेळाची मैदाने आणि सार्वजनिक मोकळी स्थळे यांचा समावेश असलेले अधिक राहण्यायोग्य शहरी वातावरण निर्माण करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
 
“लोकांना पूरक पायाभूत सुविधा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यानंतरच घरे खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण ठरतात,” असे धारावी पुनर्विकास प्रकल्पातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
 
 
सुमारे ६२१ एकर क्षेत्रफळात पसरलेल्या धारावीसमोर जागेची मोठी मर्यादा आहे. महिम नेचर पार्क, मिठी नदी, रेल्वे संरक्षित पट्टे, किनारी नियमन क्षेत्र, उच्चदाब वीजवाहिन्या, रस्ते, मोकळी मैदाने, विमानतळ उंची मर्यादा आणि इतर वगळलेल्या भूखंडांचा विचार केल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामासाठी केवळ सुमारे २७० एकर जमीन उपलब्ध असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.(Dharavi Mumbai Redevelopment)
 
या मर्यादांनंतरही पुनर्विकास आराखड्यात धारावीतील पारंपरिक ‘लाइव्ह-वर्क’ संस्कृती जपणाऱ्या मिश्र वापराच्या इमारती प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. सध्याच्या आराखड्यानुसार तळमजल्याखाली पार्किंग, तळमजल्यावर किरकोळ आणि व्यावसायिक दुकाने तसेच शोरूम्स, पोडियम स्तरावर लघुउद्योगांसाठी जागा आणि त्यावरील मजल्यांवर निवासी घरे अशी रचना प्रस्तावित आहे.(Dharavi Mumbai Redevelopment)
 
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, धारावी तसेच विस्तारित मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) विविध पुनर्वसन आणि गृहनिर्माण श्रेणींअंतर्गत सुमारे १.२५ लाख ते १.५ लाख घरे उभारली जाण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या धोरणानुसार, २००० पूर्वीचे पात्र तळमजल्यावरील रहिवासी यांना धारावीमध्येच ३५० चौरस फूट घरे विनामूल्य मिळणार आहेत. २००० ते २०११ या कालावधीतील पात्र तळमजल्यावरील रहिवाशांना धारावीमध्ये किंवा एमएमआरमध्ये ३०० चौरस फुटांची घरे सुमारे २.५ लाख रुपयांच्या अनुदानित दरात दिली जाणार आहेत. तसेच २०११ नंतर ते प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या १५ नोव्हेंबर २०२२ या अंतिम मुदतीपर्यंतच्या सर्व तळमजल्यावरील आणि वरच्या मजल्यांवरील पात्र रहिवाशांना एमएमआरमध्ये भाडे-खरेदी तत्त्वावर ३०० चौरस फुटांची घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
 
धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशातील आणि कदाचित जगातील असा पहिला मोठ्या प्रमाणावरील झोपडपट्टी पुनर्विकास उपक्रम मानला जात आहे, ज्यामध्ये पात्र वरच्या मजल्यांवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचाही विचार करण्यात आला आहे. “पुनर्विकासामुळे केवळ पत्ता बदलणे नव्हे, तर पात्र रहिवाशांच्या जीवनमानात प्रत्यक्ष आणि मोजता येईल अशी सुधारणा घडवून आणणे हेच या प्रकल्पामागील व्यापक उद्दिष्ट आहे,” असे प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले.(Dharavi Mumbai Redevelopment)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.