इंडिया आघाडी ही भीतीपोटी तयार झालेली आघाडी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11-May-2026
Total Views |
गुवाहाटी : (Devendra Fadnavis's Statement) इंडिया आघाडी ही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भीतीपोटी तयार झालेली आघाडी आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
गुवाहाटी येथे माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "इंडिया आघाडी नावाची कोणतीही आघाडी नाही. हे लोक राज्यांमध्ये भांडतात, एकमेकांवर टीका करतात आणि दिल्लीत हातात हात घेतात. ही केवळ पंतप्रधान मोदी यांच्या भीतीची आघाडी आहे. ते मोदी यांचा सामना करू शकत नसल्याने केवळ मोदीजींना हटवा हा एकच अजेंडा घेऊन ही आघाडी तयार झाली. पण ज्याच्याकडे नेता, नीती आणि विचार असेल तीच आघाडी चालते. आमच्याकडे नेता, नीती आणि विचार असल्यामुळे एनडीए पुढे जात असून इंडिया आघाडी तुकड्यांमध्ये विभागली जात आहे." (Devendra Fadnavis's Statement)
ते पुढे म्हणाले की, "आसाम येथे सलग तिसऱ्यांदा भाजपचे सरकार आल्याचा मला आनंद आहे. उद्या इथले लोकप्रिय मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे शपथग्रण करणार आहेत. ज्याप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आसाममध्ये परिवर्तन झाले आणि ज्याप्रकारे हिमंता बिस्वा सरमा यांनी इथे विकासाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे एक मोठा विजय भाजपला मिळाला आहे.
उद्या शपथग्रण करणाऱ्या हिमंता बिस्वा सरमा यांना त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. या कार्यकाळातही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आसामला नव्या उंचीवर घेऊन जाईल. पंतप्रधान मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे भाजपचा पुर्वोदय आपल्याला दिसतो आहे. यात सर्वात महत्वाचा भाग हा पश्चिम बंगाल होता. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार आले हे केवळ भाजपसाठीच नव्हे तर, भारतासाठी महत्वाचे होते. त्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता मनापासून आनंदी आहे." (Devendra Fadnavis's Statement)