नाशिक की हमारी बेटी, बहन निदा खान के लिये लडना अगर पीर का परस्ती हैं, तो हां! मैं पीर का परस्त हू,” असे नुकतेच गळा काढून ‘एमआयएम’चे इम्तियाज जलील म्हणाले. ‘पीर का परस्ती’ म्हणजे सांप्रदायिक भेदभाव करणारा. थोडक्यात, ‘धर्मांध’! ही तीच निदा जिच्यावर नाशिकमध्ये ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप आहे. जलील यांना असे वाटते की, निदाची बाजू घेऊन त्यांना लोकप्रियता मिळेल. मात्र, असे करून ते गुन्हेगारीलाच प्रोत्साहन देत आहेत. तसेच त्यांच्या कौमची आणि इतर समाजाची दुरी वाढवत आहेत. पण, इम्तियाज यांच्या नावातच ‘जलील’ असल्यावर काय म्हणावे?
मागे अमरावतीमध्ये अयान खान आणि उजेर खान या नराधमांनी अनेक मुलींचे शोषण केले. नुकतेच कोल्हापूरमध्ये शाहिद सनदे आणि शाहरुख देसाई या दोघांनीही अनेक मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवत त्यांच्यावर अत्याचार केले. ३६ तुकडे केलेली श्रद्धा वालकर असू दे की, गळा चिरलेली रूपाली चंदनशिवे की, गळा दाबून गोणपाटात कोंबलेली पूनम क्षीरसागर असू दे की, विकृत पद्धतीने खून करून मृतदेह फेकून दिलेली यशश्री शिंदे असू दे, या सगळ्या जणी ‘लव्ह जिहाद’च्या बळी ठरल्या. जलील यांच्यासारखे लोक या निष्पाप मुलींच्या मृत्यूबद्दल चकार शब्द काढत नाहीत. त्यांचा खून करणार्या गुन्हेगारांना ‘कयामत’च्या रात्री ‘दोजख’ मिळेल, असे जलील म्हणताना दिसत नाहीत. या मुलींचा खून करणारे किंवा शोषण करणारे गुन्हेगार हे त्यांच्या कौमचे आहेत म्हणून का जलील ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणात गप्प बसतात. याचाच अर्थ, गुन्हेगार आपल्या कौमचे आहेत म्हणून त्यांचे समर्थन करायचे आणि शोषित-पीडित लोक गैरमुस्लीम आहेत म्हणून त्यांच्या वरच्या अत्याचाराचे मूक समर्थन करायचे? त्यांना न्यायापासून वंचित ठेवायचे, ही धर्मांधांची मानसिकता? आता इथे काही लोक म्हणतील, अशोक खरातचे काय? तर, अशोक खरातचे कुणाही हिंदू माणसाने बिल्कूल समर्थन केले नाही. उलट, ‘खरातमुळे कलंक लागला, त्याला कडक सजा द्या’ असे म्हणतात. त्यामुळे खरात असो की निदा खान, मोहम्मद अयान की शाहिद सनदे, यांना त्यांच्या गुन्ह्याची सजा मिळायलाच हवी. ‘कौमवाले’ म्हणून त्यांचे समर्थन कुणीही करू नये. यानुसार, जलील यांच्या निदाचे समर्थन करणार्या ‘जलील’ वक्तव्याचा निषेध!
कुंपणानेच शेत खाल्ले तर...
घटना बीड जिल्ह्यातली. त्या युवकावर ‘पॉक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. पण, तुरुंगात असताना त्याची तब्येत खालावली. रुग्णालयामार्फत उपचार सुरू असतानाच, त्याचा मृत्यू झाला. यावर काही लोक समाजमाध्यमांवर संदेश प्रसारित करत आहेत की, "दलित (हा त्यांनी वापरलेला शब्द) मुलाला पोलिसांनी मारहाण केली. त्यात तो अत्यवस्थ झाला. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याला पलंगाला बांधून ठेवण्यात आले होते. एकप्रकारे त्याचा खूनच झाला.” यावर असे वाटते की, या तरुणावर ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. जर त्याने हा गुन्हा केला असेल, तर त्याचा गुन्हा क्षमा करण्यासारखा नाहीच. मात्र, तरीही तरुणाचा मृत्यू होणे, हे दु:खद आहे.
दुसरीकडे मृत आरोपीच्या भावाचे म्हणणे की, "पैसे दिले तर आरोपीला मारणार नाही, असे पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांना सांगितले होते.” काय खरे, काय खोटे? अनेक लोकांचे म्हणणे असते की, पोलिसी पेशातले शेकडा ९९ टक्के पोलीस त्यांचे काम इमानेइतबारे करतात. पण, उरलेल्या एक टक्क्यामुळे पोलिसांचे नाव बदनाम होते. ते कधीही रिक्षा/टॅक्सी प्रवासाचे भाडे देत नाहीत. बाजारातली भाजी, फळे, मासे, फेरीवाल्यांकडच्या वस्तू त्यांच्या घरी सकाळ-संध्याकाळ भेटवस्तू (?) म्हणून दिल्या जातात. सगळे बरे-वाईट धंदे कुठे, कसे, कधी चालतात, याची डिक्शनरीच त्यांच्या मेंदूत फीट असते. सणसूद-उत्सव आले की, खाण्यापिण्याचे पदार्थ, अगदी आरामदायी वस्तूंचीही मागणी कोणाकडून करायची, याची बेगमी ठरलेली असते. वस्तीपातळीवर एक गुन्हा दाखल झाला तर, "पैसे दे, नाहीतर दुसरेही गुन्हे तुझ्याच नावावर टाकतो,” असे कारस्थान कोण करते? त्यांचे नबाबी शौक, खर्च हे त्यांच्या पगारात भागतात कसे? एक ना अनेक! ९९ टक्के सज्जन पोलीसशक्तीवर प्रश्नचिन्ह उमटेल, असे वर्तन करणारे हे एक टक्का. हे जर खरे असेल, तर त्यांची मानसिकता कशी बदलेल? भीती, तिरस्कार वाटण्यापेक्षा हे संरक्षण करतील, हा विश्वास समाजाला कसा वाटेल? समाजातली गुन्हेगारी प्रवृत्ती रोखायची असेल, तर यांची समाजशीलता, संवेदनशीलता वाढवणे गरजेचे आहे. कारण, कुंपणाने शेत खाल्ले, तर न्याय कुठे मागणार?