संजय राऊत यांची कल्पकशक्ती सुमार; भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा टोला
04-Mar-2026
Total Views |
मुंबई : (Navnath Ban) "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी आणि ठाम नेतृत्वाखाली राष्ट्रीय हित, सामरिक संतुलन आणि जागतिक स्थैर्य या मुद्द्यांना प्राधान्य देत वेळोवेळी उभय देशांतील संवादाच्या बळावर आज भारत जागतिक स्तरावर स्वाभिमानाने उभा आहे. जागतिक स्तरावरील युद्धजन्य स्थितीला एपस्टीन फाईल्सशी जोडणे हे केवळ राऊतांचे कल्पनारंजन आहे. त्यांची कल्पकशक्ती सुमार दर्जाची असून बौद्धिक दिवाळखोरीचे त्यातून दर्शन घडते.परराष्ट्र धोरणासंदर्भात अज्ञानी राऊत हीन राजकारण करून राष्ट्रीय हित आणि देशाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवत असून त्यांनी संवेदनशील अशा परराष्ट्रविषयक मुद्द्यांमध्ये नाक खुपसू नये."असा घणाघात बन यांनी बुधवार दि.४ रोजी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
"राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये कुरघोड्यांचे राजकारण शिगेला पोहोचल्याने मविआचे घोडे अडले आहे. मविआ मधील तिन्ही पक्ष आपापले घोडे दामटवण्याचा प्रयत्न करत आहेत. आदित्य ठाकरे यांचा शरद पवरांच्या उमेदवारीला विरोध असताना, धूर्त संजय राऊत शरद पवारांचे नाव सातत्याने पुढे करत आहेत. उबाठा गटाचे प्रवक्ते असूनही आपली खासदारकीची टर्म संपल्यानंतर खासदारकी शाबूत ठेवण्यासाठी उबाठा गटाच्या प्रियांका चतुर्वेदींना डावलून शरद पवारांचे नाव पुढे करण्याची धूर्त खेळी संजय राऊत खेळत आहेत."अशी टीकेची झोड भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी उठवली.
उबाठा गटाच्या उमेदवारीबद्दल राऊतांच्या शब्दांना काडीचीही किंमत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी बन म्हणाले की, "राऊत आणि उबाठा गट हे वारंवार माती खात असल्यानेच मतदारांनी विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अशा लागोपाठच्या निवडणुकांमध्ये त्यांना घरी बसवले आहे."