मुंबई : नुकताच स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा पार पडला. याच निमित्ताने स्वामींची महती सांगणारं एक गोड गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. स्वामींचा संदेश नेहमीच आत्मविश्वासाला अजून बळ देतो. असंच “स्वामी गुरुमाऊली” हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं हृदयस्पर्शी, भावनिक, आणि प्रेरणादायी असून या गाण्यात अभिनेता प्रियेश चव्हाणसह रुहान गांगणे, साक्षी मोरे, पद्मश्री उपळे, अनिकेत ढोले, मानसी अडगळे, श्रीषा घुबडे, रोहन कुलकर्णी, सारिका देशमुख यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हे गाण ऋषभ साठे, शीतल गद्रे, बालगायक मल्हार यांनी गायल आहे. या गाण्याचे संगीत प्रज्वल यादव यांनी केले आहे. या गाण्याची कथा, पटकथा व दिग्दर्शन सनी कांबळे यांनी केलं आहे. या गाण्याची निर्मिती तेजस पानसरे आणि सनी कांबळे यांनी केली आहे. या गाण्याचे छायाचित्रण रोहित जेंकेवाड यांनी केले आहे.
अभिनेता सनी कांबळे गाण्याविषयी सांगतात. “जेव्हा मी हे रेकॉर्ड लेबल सुरू करायचं ठरवलं तेव्हा सुरुवात स्वामींच्या गाण्यापासून करायचं ठरवलं. मी आणि माझा मित्र तेजस पानसरे आम्ही या गाण्याची निर्मिती केली आहे. या चार महिन्यांच्या प्रवासात माझ्या सोबत प्रितम कांबळे यांनी मनापासून काम केले आहे. यांची साथ लाभली नसती तर हे गाण पूर्णत्वाला गेल नसत. संगीतकार प्रज्वल यादव आणि एडिटर विनय शिंदे यांनी तर या गाण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. माझ्या अपेक्षेपेक्षा सुंदर असा टीज़र आणि गाण तयार झाल. या गाण्याचा टीज़र जेव्हा आम्ही एडिट करत होतो. तेव्हा टीज़र मधली वाक्य खरी वाटत होती. (आयुष्य जेव्हा आपल्याला गुडघ्यावर बसवत. तेव्हा तिथूनच उभ राहण्याची ताकद ही मिळते. राग मनात ठेवला की तो आपल्यालाच चारतो. पण श्रद्धा आणि संयम माणसाला नव्याने घडवतात. देवावर रुसण्यापेक्षा स्वतःकडे पाहील तर कदाचित उत्तर सापडेल. जगाला दोष देण सोप्प असत. पण जगाकडे प्रेमाने पाहिलं. तर ते वेगळच दिसत. संकट येतात म्हणजे देव दूर गेला अस नसत. कदाचित तो आपल्याला मजबूत बनवत असतो.) या गाण्याच्या टीज़रला सोशल मीडियावर खुप चांगला प्रतिसाद मिळाला.”
पुढे सनी गाण्याविषयी सांगतात. “हे गीत एका तरुणाच्या भावनिक प्रवासाची कथा सांगते. तो जीवनावर आणि स्वामींवर रागावतो, त्याच्या मनात श्रद्धेऐवजी प्रश्न निर्माण होतात. दुःख, राग आणि संभ्रम यांच्या प्रवासातून तो हळूहळू पुन्हा स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवू लागतो. ही कथा भक्ती, विश्वास आणि स्वामी समर्थांच्या कृपेची जाणीव करून देणारी आहे. श्री स्वामी समर्थ.”