मुंबई : (Indian Captain Death) पश्चिम आशियामध्ये सुरु असलेल्या इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाचे तीव्र पडसाद भारतासह जगभरात उमटत आहेत. अशातच २८ फेब्रुवारीपासून होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या 'अवाना' जहाजाचे कॅप्टन राकेश रंजन सिंह (४७) यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. राकेश हे झारखंडची राजधानी रांचीचे रहिवासी असून मूळचे बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील बिहार शरीफचे रहिवासी होते. राकेश यांच्या निधनाच्या बातमीने त्यांचे संपूर्ण कुटुंब हादरले असून, संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. (Indian Captain Death)
युद्धामुळे जहाज १८ दिवस समुद्रातच
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टन राकेश रंजन सिंह गेल्या महिन्यात २ फेब्रुवारी रोजी आपली रजा पूर्ण करून 'अवाना' जहाजावर रुजू झाले होते. हे जहाज तेल खरेदीसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून गेले होते. तेल भरल्यानंतर, हे जहाज १ मार्च रोजी भारताकडे निघाले होते, परंतु युद्धाच्या परिणामामुळे दुबईपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर समुद्रात नांगर टाकून थांबले होते. कॅप्टन राकेश यांच्यासह सुमारे ३५ कर्मचारी 'अवाना' जहाजावर होते, जे गेल्या १८ दिवसांपासून समुद्रात अडकले होते. (Indian Captain Death)
युद्धाच्या परिस्थितीमुळे हवाई रुग्णवाहिकेस विलंब
माध्यमांच्या वृत्तानुसार, १८ मार्च रोजी कॅप्टन राकेश यांची प्रकृती अचानक खालावली. जहाजाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दुबई एटीसीशी संपर्क साधून हवाई रुग्णवाहिकेसाठीविनंती केली, परंतु युद्धाच्या परिस्थितीमुळे परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर, त्यांना बोटीने दुबईच्या किनाऱ्यावर आणण्यात आले, परंतु या प्रक्रियेला बराच वेळ लागला. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांची प्रकृती खालावली आणि अखेरीस हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. युद्धजन्य परिस्थितीमुळे वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने राकेश यांना जीव गमवावा लागला. (Indian Captain Death)
कॅप्टन राकेश यांचे पार्थिव दुबईमध्ये ठेवण्यात आले असून, नालंदा येथे अंत्यसंस्कार केले जातील. कॅप्टन सिंग यांचा मृतदेह सध्या दुबईतील शेख रशीद रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. पाटणा विमानतळावर पोहोचल्यानंतर, अंतिम संस्कारांसाठी तो नालंदा जिल्ह्यातील बिहार शरीफ येथे नेण्यात येईल. (Indian Captain Death)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\