मुंबई : राज्यातील रब्बी हंगाम २०२५-२६ मधील 'ई-पीक पाहणी' करण्याची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात येत असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी विधानसभेत केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "२५ जानेवारी २०२६ पासून सहाय्यक स्तरावर ई-पीक पाहणीची नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
मात्र, आतापर्यंत रब्बी हंगामातील पिकांची केवळ ५५.६९ टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे. सुमारे ४५ टक्के शेतकरी या नोंदणी प्रक्रियेपासून लांब आहेत. ही नोंदणी १०० टक्के पूर्ण व्हावी, या हेतूने सरकारने मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पीक विम्यासह सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ई-पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची आहे.” "जमाबंदी आयुक्त आणि कृषी आयुक्त यांनी समन्वयाने काम करून 'ॲग्री स्टॅक' मधील डेटाची नोंदणी तातडीने पूर्ण करावी, अशी सूचना प्रशासनाला केली आहे. पीक पाहणीची पडताळणी अचूक आणि वेळेत व्हावी, यासाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे," असेही त्यांनी सांगितले.