nt-मुंबई : (Devendra Fadnavis) "छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान भारतीय इतिहासात अद्वितीय असून टिपू सुलतानला त्यांच्यापेक्षा मोठे मानणे चुकीचे आहे. जर कोणी टीपू सुलतान छत्रपती शिवाजी महाराजांइतकेच मोठे राजा होता असे म्हणत असेल, तर त्यावर आम्हाला आक्षेप आहे." विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याबाबत तीव्र आक्षेप नोंदवला.
विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस पुढे म्हणाले, “आमचा आक्षेप टीपू सुलतान चांगला होता की वाईट यावर नाही. त्यावर चर्चा होऊ शकते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांइतकाच मोठा राजा म्हणून त्याची तुलना केली जाते किंवा शिवाजी महाराजांप्रमाणेच त्याचेही गुणगान व्हावे असे म्हटले जाते, याला आमचा विरोध आहे.”
इतिहासाशी छेडछाड झाल्याचा आरोप करत मुख्यमंत्री म्हणाले की, “इतिहासात आम्हाला टीपू सुलतान महान राजा होता असे शिकवले गेले; पण त्याने ७५ हजार हिंदूंची हत्या केल्याचे का सांगितले गेले नाही? टिपू सुलतान इंग्रजांविरुद्ध लढला, परंतु तो आपले राज्य टिकवण्यासाठी लढला होता. मात्र आता खरा इतिहास समोर येत आहे. जर योग्य वेळी योग्य इतिहास शिकवला गेला असता, तर या देशातील कोणताही मुस्लिम औरंगजेबाला किंवा टिपूला आपला नायक म्हणाला नसता.”