छत्रपती शिवरायांचे स्थान भारतीय इतिहासात अद्वितीय; टीपूला त्यांच्यापेक्षा मोठे मानणे चुकीचेच!

विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना खडेबोल

    27-Feb-2026   
Total Views |
nt-

मुंबई : (Devendra Fadnavis) "छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान भारतीय इतिहासात अद्वितीय असून टिपू सुलतानला त्यांच्यापेक्षा मोठे मानणे चुकीचे आहे. जर कोणी टीपू सुलतान छत्रपती शिवाजी महाराजांइतकेच मोठे राजा होता असे म्हणत असेल, तर त्यावर आम्हाला आक्षेप आहे." विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याबाबत तीव्र आक्षेप नोंदवला.

विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस पुढे म्हणाले, “आमचा आक्षेप टीपू सुलतान चांगला होता की वाईट यावर नाही. त्यावर चर्चा होऊ शकते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांइतकाच मोठा राजा म्हणून त्याची तुलना केली जाते किंवा शिवाजी महाराजांप्रमाणेच त्याचेही गुणगान व्हावे असे म्हटले जाते, याला आमचा विरोध आहे.”

हेही वाचा : Arvind Kejriwal : आताच सुटका आणि लगेच हायकोर्टाची टांगती तलवार? अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी पुन्हा वाढणार?

इतिहासाशी छेडछाड झाल्याचा आरोप करत मुख्यमंत्री म्हणाले की, “इतिहासात आम्हाला टीपू सुलतान महान राजा होता असे शिकवले गेले; पण त्याने ७५ हजार हिंदूंची हत्या केल्याचे का सांगितले गेले नाही? टिपू सुलतान इंग्रजांविरुद्ध लढला, परंतु तो आपले राज्य टिकवण्यासाठी लढला होता. मात्र आता खरा इतिहास समोर येत आहे. जर योग्य वेळी योग्य इतिहास शिकवला गेला असता, तर या देशातील कोणताही मुस्लिम औरंगजेबाला किंवा टिपूला आपला नायक म्हणाला नसता.”



ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक