Devendra Fadnavis : विरोधक भ्रमितही आणि संभ्रमितही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला

    26-Feb-2026   
Total Views |
Devendra Fadnavis
 
मुंबई: (Devendra Fadnavis) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी गुरुवार दि. २६ फेब्रुवारी रोजी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला. विरोधी पक्ष भ्रमितही आहे आणि संभ्रमितही आहे, असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांनी लगावला.
 
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुख्यमंत्री नेमंक काय म्हणाले? खरं म्हणजे सगळी चर्चा पाहिल्यानंतर आणि एकूणच विरोधी पक्षांचा सूर पाहिल्यानंतर असं वाटलं कि, विरोधी पक्ष भ्रमितही आहे आणि संभ्रमितही आहे. त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर भाष्य करत सांगितले की, आज विरोधकांच्या वागणुकीत स्पष्टपणे गोंधळ दिसतोय. काही मुद्द्यांवर विरोधकांचा सूर कायम असला तरी त्यांच्या चर्चेतील तार्किकता आणि स्थिरता आज स्पष्ट नाही.
 
भ्रमित आणि संभ्रमित यातील फरक
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना समजून सांगण्यासाठी भ्रमित आणि संभ्रमित यातील फरक स्पष्ट केला. त्यांनी सांगितले, “इंग्रजीत Confused म्हणजे भ्रमित आणि Flustered म्हणजे संभ्रमित. उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती रस्ता चुकल्यावर एका ठिकाणी येतो जिथे दोन मार्ग दिसतात. त्याला कुठे जावे हे ठरवता येत नसल्यास तो संभ्रमित आहे. पण जर त्याला पाणी दिसते आणि तो त्या दिशेने धावत गेला, आणि नंतर लक्षात येते की ते मृगजळ आहे, तर तो भ्रमित आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे सध्याचे वर्तन या उदाहरणाद्वारे स्पष्ट केले.
 
शांतपणे विचार करून मुद्दे मांडण्याची गरज
फडणवीसांनी विरोधकांना सुचवले की, “भ्रमात राहून धावण्यापेक्षा संभ्रमातून बाहेर पडण्यासाठी शांतपणे विचार करून आपले मुद्दे मांडणे महाराष्ट्राच्या हितासाठी अधिक फलदायी ठरेल.” त्यांनी असेही म्हटले की विरोधक जर संयम राखून आणि समजून मुद्दे मांडले, तर राज्याच्या विकासासाठी आणि कामकाजासाठी त्यांचा योगदानही मोठ्या प्रमाणात वाढेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या भाषणातून विरोधकांना सावध करण्याचा आणि सुधारणा करण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतो, तसेच विधानसभेत शिस्तपूर्ण आणि परिणामकारक चर्चेला प्रोत्साहन दिले आहे.

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.