मुंबई: निष्पाप मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी सलीम हा सुरेश हे खोटे नाव वापरून प्रेमप्रकरण करतो, परंतु यापुढे राज्यात जर असे कोणी असे करणार असेल तर त्याला धडा शिकवला जाईल, असे मत गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांनी गुजरात राज्यात विवाह नोंदणी कायदा, २००६ मध्ये सुधारणा प्रस्तावित केल्या असून आता विवाह नोंदणीसाठी पालकांची संमती अनिवार्य करण्याची तरतूद समाविष्ट केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा नियम ४४ अंतर्गत गुजरातच्या राज्य विधानसभेत प्रस्ताव मांडताना हर्ष संघवी यांनी पंचमहल जिल्ह्यात एकही मुस्लिम किंवा मशीद नव्हती तरीही शेकडो निकाह प्रमाणपत्रे जारी करण्यात आली तसेच बनासकांठा, नवसारी आणि मेहसाणा जिल्ह्यांत खोटी प्रेमप्रकरणे समोर आली असे सांगत विवाह नोंदणी कायदा, २००६ मध्ये बदल करण्याची गरज बोलून दाखवली.
ते पुढे म्हणाले की, अशा प्रकारची दुरूस्ती करणे हे सार्वजनिक हितासाठी महत्त्वाची आहे. राज्य सरकार प्रेम विवाहांच्या विरोधात नाही परंतु मुलींच्या प्रतिष्ठेचे आणि सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी ही दुरुस्ती प्रस्तावित करत आहे. विवाह नोंदणी प्रक्रियेत पालकांची संमती अनिवार्य करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच विवाह नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर त्यांना व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे अधिकृतपणे कळवले जाईल.
सहायक निबंधकांच्या पुष्टीकरणानंतर कामकाजाच्या दहा दिवसांत वधू-वरांच्या पालकांना कळवले जाईल आणि शक्य तितक्या इलेक्ट्रॉनिक किंवा सरकारने विहित केलेल्या माध्यमांद्वारे कळवले जाईल, असे प्रस्तावात म्हटले आहे.
सूचना पाठवण्यासाठी ३० दिवस
प्रस्तावित बदलांवर सार्वजनिक सूचना आणि शिफारशींसाठी सरकारने ३० दिवसांचा कालावधी जाहीर केला. कायद्यात सुधारणा करण्यापूर्वी सूचना आणि शिफारशींचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल आणि विवाह नोंदणीसाठी एक पोर्टल तयार केले जाईल. प्रस्तावित नियमावलीनुसार, विवाह नोंदणीसाठी किमान ३० दिवस लागतील.
महाराष्ट्रात कधी होणार?
गेले अनेक दशके महाराष्ट्रात सकल हिंदू समाजाकडून लव्ह जिहाद विरोधी कायदा यावा यासाठी आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले आहेत. मात्र अजूनही राज्यात लव्ह जिहाद आणि लँड जिहाद विरोधी कायदा अंमलात आणला गेला नाही.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.