मुंबई :( RSS Leader Dattatreya Hosabale ) आज सोशल मीडिया सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या सामग्रीने भरलेला आहे. मुलांना त्याच्या नकारात्मक परिणामांपासून वाचवण्यासाठी, त्यांना भारतीय संस्कृतीशी जोडणे आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी मुलांशी संवाद साधण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी व्यक्त केले. ते संघ शताब्दी निमित्त रांची येथे आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक सद्भाव बैठकीत बोलत होते.
या कार्यक्रमात विविध संघटना, जाती, समुदाय आणि समुदायातील ६०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना सरकार्यवाह म्हणाले की, आपण कोणत्या कुटुंबात किंवा जातीत जन्माला यावे ते आपल्या हाती नसते. मग आपण जातिवाद का पाळतो? कोणत्याही जातीला कनिष्ठ किंवा श्रेष्ठ मानू नये.
यावेळी त्यांनी हिंदू समाजासाठी आवश्यक असलेल्या कार्यावर भर दिला. त्यांनी सामाजिक सेवांचा विस्तार, सरकारी कार्यक्रमांचे फायदे शेवटच्या घटकांपर्यंत पोहचले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यासोबतच त्यांनी गरिबी, निरक्षरता आणि वंचिततेमुळे ग्रस्त असलेल्यांना मुख्य प्रवाहात आणले जावे असे सांगितले.
पारशी समुदायाचे उदाहरण देत सरकार्यवाह म्हणाले की, कठोर परिश्रमाने प्रगती कशी करता येते हे पाहायचे असेल तर पारशी समाजाकडे पाहायला हवे. त्यांनी स्वातंत्र्याच्या वेळी पारशी समुदायाने सरकारकडून कोणत्याही आरक्षणाची मागणी केली नव्हती हे देखील निदर्शनास आणून दिले.
बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, घुसखोरीद्वारे राजकीय फायदा मिळवला जात आहे. आज बांगलादेशातील हिंदूंची दुर्दशा लपून राहिलेली नाही. सीमेवरील कुंपण एक मोठे आव्हान आहे आणि कधीकधी आपलेच लोक घुसखोरांना आश्रय देतात. सरकार एसआयआरसह विविध मार्गांनी या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहे.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.