मराठी माणसाला बेघर करणाऱ्यांना 'एसआरए'वर बोलण्याचा अधिकार नाही; नवनाथ बन यांची संजय राऊतांवर टीका

    16-Sep-2025   
Total Views |

मुंबई : पत्राचाळ घोटाळ्यातून मराठी माणसाला बेघर करणाऱ्यांना 'एसआरए'वर बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर केली. मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत यांनी एसआरए घोटाळ्यावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना नवनाथ बन म्हणाले की, "पत्राचाळ घोटाळ्यासह हजारो कोटींचे घोटाळे केलेल्या घोटाळेबाज खा. संजय राऊत यांना एसआरए बद्दल ब्र देखील काढण्याचा अधिकार नाही. 'एसआरए' मध्ये घोटाळा झाल्याचे बिनबुडाचे पोकळ आरोप करणाऱ्या राऊत यांनी एसआरए घोटाळ्याबद्दल हवेत बाण सोडण्यापेक्षा पुरावा असलेला एक कागद दाखवा. त्यांनी पुराव्याविना खोटे पसरवण्याचा धंदा त्वरित बंद करावा. एसआरएचे सर्व प्रकल्प पारदर्शकरित्या पार पडले असून एकाही ठिकाणी बेकायदेशीर टेंडर काढलेले नाही," असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी कोविड काळातील डेड बॉडी बॅग, शवपेटी आणि खिचडीच्या वाटपातल्या अनेक घोटाळ्यांचा पाढाच वाचला.

तुमचा वाढदिवस भांडुपच्या गल्लीत तरी साजरा होतो का?

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील प्रेमाखातर सर्वसामान्य जनता संपूर्ण देशभरात त्यांचा वाढदिवस उत्स्फूर्तपणे साजरा करते. सलग तीन वेळा जनतेने बहुमत देऊन पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवला. त्यांच्यावर टीका करणे म्हणजे जनतेच्या निर्णयावर आक्षेप घेणे. राऊत आणि ठाकरे कधीच जनतेतून निवडून आले नाहीत. विरोधकांनी आधी निवडणूक जिंकावी, मग टीका करावी. जनतेचा आशीर्वाद मोदीजींच्या पाठीशी आहे तर, दुसरीकडे विरोधकांना मात्र, शिव्यांची लाखोली मिळते. संजय राऊत जेव्हा जेव्हा मोदींवर थुंकण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ती थुंकी परत त्यांच्याच तोंडावरच उडते. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसात समाजातील प्रत्येक घटक सामील होतो, तर राऊत यांचा वाढदिवस भांडुपच्या गल्लीत तरी साजरा होतो का?," असा सवालही नवनाथ बन यांनी केला.

शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांनी कर्जमाफीवर बोलू नये

"शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांनी कर्जमाफीवर बोलू नये. २०१७ मध्ये फडणवीस सरकारने संपूर्ण कर्जमाफी केली, मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड आणि नदीजोड योजना सुरू केल्या. मात्र, उद्धव ठाकरे सरकारने त्या प्रकल्पांवर गंडांतर आणले. शेतकऱ्यांच्या पिकाशी, बांधाशी, जमिनीशी काहीही संबंध नसताना संजय राऊत फुकाची भाषणे देतात. पण, देवेंद्र फडणवीस सातत्याने शेतकऱ्यांसाठी काम करतात, मोफत वीज ते पाणीपुरवठा अशा प्रत्येक योजनेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतात. समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, मेट्रो, अटल सेतू यासारखे अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या भाग्यरेषा बदलत असून यातील प्रत्येक पैशाचा हिशोब आमच्याकडे आहे. ठाकरेंच्या कार्यकाळात पोलीस आयुक्तांनाच १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिले गेले, रोजच्या खंडणीचा बाजार लावला गेला. आम्ही जनतेसाठी प्रकल्प उभे केले, तुम्ही मात्र स्वतःसाठी अलिबागला फार्महाऊस बांधले. कोण विकास घडवतो आणि कोण जनतेच्या पैशांतून स्वत:च्या तुंबड्या भरतो हे सूज्ञ जनता जाणते," अशी टीकाही त्यांनी केली.

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....