मुंबई : आष्टी तालुक्यात पुरामुळे अडकलेल्या ४० जणांना एअरलिफ्ट करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार, १५ सप्टेंबर रोजी दिले. राज्यभरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालिन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, कार्य केंद्राचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण आदी उपस्थित होत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड जिल्ह्यातील आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने अडकलेल्या ४० ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे निर्देश यावेळी दिले. तसेच अतिवृष्टी असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत मदत आणि बचावकार्याबाबत माहिती घेत जिल्हा प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या.
यासोबतच त्यांनी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून त्यांच्याकडून पावसाची परिस्थिती जाणून घेतली. तसेच मुंबईत जिथे पाणी साचल्याच्या तक्रारी येत आहेत तिथे अतिरीक्त मनुष्यबळ तैनात करून लवकरात लवकर पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप बसविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी दिलेल्या हवामान अंदाजानुसार पावसाची परिस्थिती कशी राहणार, त्यानुसार आपत्ती नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....