मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळामध्ये वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या लाभार्थी महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी विशेष कर्ज धोरण राबविण्यात येत आहे. या कर्ज योजनेशी सांगड घालण्यासाठी महामंडळांनी मुंबई बँकेशी करार करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बुधवार, ११ सप्टेंबर रोजी दिले.
मुंबई बँकेने सुरू केलेल्या विशेष कर्ज योजना तसेच अंगणवाडी बांधकाम संदर्भात मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, आ. चित्रा वाघ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, विभागाचे सहसचिव वि. रा. ठाकूर, वित्त विभागाचे सहसचिव स्मिता निवतकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, "मुंबई बँकेला व्याज परतावा योजनांसाठी प्राधिकृत करून तातडीने सामंजस्य करार करावा. महामंडळाच्या व्याज परतावा योजनेच्या लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार असल्याने यांना अपात्र ठरवता येणार नाही. यासंदर्भात विशेष सूचना जारी करण्यात याव्यात. या योजनेच्या माध्यमातून मुंबईतील पात्र महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यास सहकार्य लाभणार आहे."
महिलांना एक लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार : आ. प्रवीण दरेकर
"मुंबई बँकेच्या या उपक्रमांतर्गत महिलांना एक लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. यामध्ये ५ ते १० महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात. १० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करण्यात येणार आहे. मुंबई बँकेची मुंबईत एकूण १६.०७ लाख बचत खाती आहेत. त्यापैकी लाडकी बहीण योजने अंतर्गत ५३ हजार ३५७ महिलांची शून्य शिल्लक खाती उघडली. पात्र महिलांना शासनाकडून दरमहा १५०० थेट खात्यात जमा होत आहेत."
अंगणवाडी बांधकामात आधुनिक तंत्राचा वापर करावा
"राज्यातील अंगणवाड्यांच्या बांधकामात एकसमान पद्धत असावी. तसेच आधुनिक तंत्राचा वापर करून अंगणवाड्या उभाराव्यात. वीज पुरवठा करताना ऊर्जा बचतीसाठी सोलार प्रकल्पाला प्राधान्य द्यावे. तसेच अंगणवाडीमध्ये पुरवठा करण्यात येणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता वाढावी यासाठी तातडीने उपाययोजना आखाव्यात," असे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....