मुंबईतील हजारो इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळणार: पालकमंत्री ॲड. आशिष शेलार

    11-Sep-2025   
Total Views |

मुंबई : मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार, म्हाडा, एसआरए आणि इतर प्राधिकरणांनुसार बांधकाम झालेले परंतू विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र (OC) न मिळालेल्या २५ हजारांहून अधिक इमारतींना आता भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत धोरण तयार करण्यात येणार आहे, असे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी गुरुवार, ११ सप्टेंबर रोजी सांगितले.

महानगरपालिका, नगर विकास विभाग, महसूल विभाग आणि सहकार विभाग यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीस माजी खासदार गोपाल शेट्टी, स्थानिक आमदार मनिषा चौधरी, उत्तर मुंबईतील भाजपा पदाधिकारी तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून लाखो मुंबईकर स्वतःच्या घरात राहूनही कायदेशीरदृष्ट्या 'बिगरवासी' म्हणून राहत होते. यासाठी नागरिकांचा काहीही दोष नसून, त्याकाळच्या नियमांमधील पळवाटा किंवा विकासकांच्या चुका यामुळे हा प्रश्न निर्माण झाला होता. यासाठी नगर विकास विभाग २ ऑक्टोबरपासून एक नवे धोरण लागू करणार आहे. या धोरणाअंतर्गत बांधकामादरम्यान झालेल्या तांत्रिक किंवा प्रशासकीय चुका दूर करून इमारतींना सुटसुटीत पद्धतीने ओसी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे परवानगीच्या क्षेत्रफळातील फरक, सेटबॅकशी संबंधित अडचणीसारख्या कारणांमुळे ओसी रोखल्या गेलेल्या इमारतींनाही दिलासा मिळणार आहे. त्याचप्रमाणे, नियमावलीतील बदल, धोरणातील बदल यामुळे अडकलेल्या इमारतींनाही मोकळीक मिळेल. तसेच विकासकाकडून प्रशासनाला द्यावयाच्या जागा/फ्लॅट्स न दिल्यामुळे नागरिक अडचणीत असतील तरीही त्यांना ओसी मिळवण्याचा मार्ग उपलब्ध होणार आहे. पारदर्शक पध्दतीने ऑनलाइन ही प्रक्रिया राबविली जाणार आहे, अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली.

नव्या धोरणातील महत्त्वाचे मुद्दे
•भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सोसायट्यांनी पुढाकार घ्यावा.
•सोसायट्या एकत्रित किंवा वैयक्तिकरीत्या प्रस्ताव देऊन पार्ट-ओसी मिळवू शकतील.
•पहिल्या सहा महिन्यांत अर्ज केल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही.
•मात्र अतिरिक्त वापरलेला एफएसआय असल्यास त्यासाठी प्रीमियम भरावा लागणार.

"मुंबईतील हजारो इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र नसल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही दिवसांपूर्वी मी एका निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अमीत साटम, माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी बैठक घेऊन याबाबत धोरण निश्चित करण्याचे जाहीर केले. या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. अखेर लाखो मुंबईकरांसाठी देवाभाऊ पुन्हा धावून आले, महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे पुन्हा एकदा धन्यवाद."
- मंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....