शेतीतील वाहतूकीच्या समस्येवर रामबाण उपाय; पाणंद रस्त्यांसाठी 'मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते' योजना घोषित विधानसभा आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणार

    10-Sep-2025   
Total Views |

मुंबई : राज्यातील शेतीतील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने एक नवीन योजना घोषित केली आहे. मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत पाणंद रस्त्यांसाठी 'मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते' योजनेची घोषणा करण्यात आली आहे.

या बैठकीला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांच्यासह समितीतील खासदार आणि आमदार उपस्थित होते.

शेतीतील वाहतूकीची समस्या सोडवण्यासाठी 'मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते' या नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. त्याबरोबरच विधानसभा आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असून या रस्त्यांसाठी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करण्यात यावा, तसेच यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांती घडविणारी ही योजना आहे. शेतकऱ्याच्या शेतापर्यंत रस्ते, वीज आणि पाणी पोहचले तर त्याला आपला माल बाजारपेठेत घेऊन जाणे शक्य होणार आहे. यासाठी राज्य सरकारने प्राधान्याने या योजनेवर भर दिला असून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत या योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने कार्यकाही होणे आवश्यक आहे. यासाठी प्रथमतः सीमांकन करणे आवश्यक असून सर्व आमदारांनी याबाबत अतिदक्ष राहून सर्व पाणंद रस्ते नकाशावर आणावेत. हा नकाशा पुढील महिनाभरात गावामध्ये प्रसिद्ध करण्यात यावा. विविध १३ योजनांच्या माध्यमातून सध्या या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा," असे त्यांनी सांगितले.

आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती

या योजनेच्या कामकाजासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली मतदारसंघनिहाय एक समिती स्थापन केली जाईल. समितीत प्रांताधिकारी सदस्य सचिव तर तहसीलदार, गटविकास अधिकारी, भूमि अभिलेख अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि वन विभागाचे अधिकारी काम करतील. सुरुवातीच्या सहा महिन्यांत रस्त्यांचे सीमांकन करणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील सहा महिन्यांत गावाचा नकाशा तयार करून तो गावात प्रसिद्ध करावा. तसेच रस्त्यांच्या दर्जावर भर देत चांगली माती आणि मुरुम वापरण्याची सूचना यावेळी देण्यात आली.

निधी कसा उपलब्ध होणार?

या योजनेसाठी मनरेगा आणि इतर १३ विविध योजनांतून निधी उपलब्ध केला जाईल. सीएसआर (CSR) निधीचा उपयोग करण्यासाठी प्रांताधिकारी यांचे विशेष खाते तयार केले जाईल. तसेच एक किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रस्त्यांना व्हीआर नंबर देण्यासाठी प्रस्ताव पाठवला जाणार आहे.

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....