कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    05-Aug-2025   
Total Views |

मुंबई : कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नसून पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी दिले. कबुतरखान्याच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे या तिन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नसून कबूतरखान्याबाबत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करताना पर्यायी उपाययोजना करण्यात याव्यात. कबूतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवावा.

"कबुतरखान्याशी संबंधित मुद्यांवर सध्या उच्च न्यायालयात रिट याचिकेवर सुनावणी सुरू आहे. या विषयावर राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिकेने हायकोर्टात आपली भूमिका मांडावी. गरज भासल्यास याप्रकरणी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर आवश्यकतेनुसार सर्वोच्च न्यायालयातही राज्य शासन आपली भूमिका मांडेल," असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबई महापालिकेला पक्षीगृह उभारण्याची आणि त्याची देखभाल करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक

"कबुतरांच्या आरोग्यपूर्ण देखभालीसाठी आणि नागरी आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही यासाठी कोणत्या वेळेत खाद्यपुरवठा व्हावा आणि कोणत्या वेळेत नाही याबाबत नियमावली तयार करण्यात यावी. शहरात विविध ठिकाणी कबुतरांच्या मोठ्या संख्येमुळे श्वसनविषयक त्रास, विष्ठेमुळे होणारे प्रदूषण आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या समस्या निर्माण होतात. परंतू, याबाबत कबुतरखान्याच्या आरोग्यविषयक दुष्परिणामांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक असून त्यासाठी संबंधित तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास अहवाल तयार करावा. कबुतरांच्या विष्ठेचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासंदर्भात विष्ठा साफ करण्यासाठी उपलब्ध असलेल्या तांत्रिक उपायांचा विचार करावा. तसेच यासंदर्भात माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्याशी चर्चा केली आहे," असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांच्या भावना समजून घेत कबुतरखान्यांबाबत अतिशय चांगला निर्णय दिल्याबद्दल मी हिंदू समाज आणि जैन समाजातर्फे त्यांचे आभार मानतो. या निर्णयानंतर आजपासून कबुतरखान्यांमध्ये नियंत्रित खाद्यपुरवठा केला जाणार आहे. कबुतरांना खाद्य टाकल्याने आरोग्याची समस्या निर्माण होत असल्यास मशीनरीनचा वापर केला जाणार आहे. तसेच कबुतरांची विष्ठा साफ करण्यासाठी ‘टाटा’ने तयार केलेल्या नवीन मशीनचा वापर केला जाणार आहे.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....