मुंबई : मराठा समाजाला न्याय देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि याऊलट कोणतीही भूमिका न घेणारे काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार गट आहेत. महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाशी द्रोह करणारे या तीन पक्षांचे राजकारण हाणून पाडा, अशी प्रतिक्रिया भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवार, २९ ऑगस्ट रोजी दिली आहे.
केशव उपाध्ये म्हणाले की, "मराठा समाजाचे मुंबईतील आंदोलन हे शांततामय ऐतिहासिक होईलच, पण या आंदोलनाबाबत बोलतय कोण? महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाकडे दुर्लक्ष करणारे उध्दव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्ष, मराठा समाजाच्या मूक मोर्चाची ‘मुका मो’र्चा म्हणून हेटाळणी करणारे सामना, आरक्षणचे विषय आता नको म्हणणारे शरद पवार, आणि वर्षानुवर्षे मराठा समाज केवळ मतपेढी म्हणून पाहणारा काँग्रेस पक्ष. आजही हे तिघेही केवळ राजकारण करू पहात आहेत."
जरांगेंच्या मागणीवर तिघेही मूग गिळून गप्प"ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मनोज जरांगे यांच्या मागणीवर हे तिघेही मूग गिळून गप्प आहेत. आता या पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही भाजपाची भूमिका आहे. याबाबत कायदेशीर बाबी भक्कम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका करावी, लोकशाहीतील तो अधिकारच आहे. पण आता शरद पवार, उध्दव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाकडे त्यांच्या मागणीबाबत स्पष्टता मागायला हवी. कारण सर्वाधिक संवेदनशील हे देवेंद्रजी सरकार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय हा देवेंद्रजींनी घेतला, आताही अशा वेळी त्यांच्या नावाने टीका करून काय साध्य करीत आहोत?" असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "महायुती सरकार असतानाच मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मिळाले आणि सध्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला रद्द केले नाही. शिंदे समितीस मुदतवाढ मिळावी या त्यांच्या मागणीला सहा महिने मुदतवाढ दिली. मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांना नोकरी मिळावी ही मागणीसुध्दा जवळपास पूर्ण झाली. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातून मराठा समाजातील एक लाख उद्योजक निर्माण करण्यासाठी, ८ हजार ३२० कोटींचे कर्ज वाटप केले. राजर्षी शाहू महाराज शुल्कप्रतिपूर्ती योजनेतून मराठा समाजातील १७.५४ लाख विद्यार्थ्यांना ९ हजार २६२ कोटी दिले," असेही केशव उपाध्ये यांनी यावेळी सांगितले.