धर्मांतरण हे समाज फोडण्याचे षड्यंत्र! जगद्गुरु रामभद्राचार्य महाराज यांचे प्रतिपादन

    20-Aug-2025   
Total Views |

मुंबई : वृंदावन येथे आयोजित कथा कार्यक्रमादरम्यान जगद्गुरु रामभद्राचार्य महाराज यांनी अनेक सामाजिक व धार्मिक विषयांवर आपले विचार व्यक्त केले. त्यांनी धर्मांतर, लव्ह जिहाद, मंदिरांचे अधिग्रहण, संत समाजाची स्थिती आणि श्रीकृष्ण जन्मभूमीशी संबंधित प्रकरण यावर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. धर्मांतरणाला एक गंभीर समस्या म्हणत हे समाज फोडण्याचे षड्यंत्र असल्याचे त्यांनी सांगितले. ते स्पष्टपणे म्हणाले की, सनातन धर्माशी खेळ करणाऱ्यांचा नक्की बदला घेतला जाईल.

रामभद्राचार्य महाराजांनी यावेळी हिंदू मुलींना आवाहन केले की त्यांनी सजग राहावे आणि लव्ह जिहादसारख्या प्रपंचांपासून वाचावे. त्यांनी म्हटले की मुलींनी आता समजून घ्यावे, त्यांना राणी लक्ष्मीबाई प्रमाणे धैर्यशील व्हावे लागेल. मंदिर अधिग्रहणाच्या विषयाला कठोर विरोध दर्शवत ते म्हणाले, आम्ही मंदिरांच्या सरकारी अधिग्रहणाला ठाम विरोध करतो आणि प्रत्येक स्तरावर याचा प्रतिकार करू. श्रीकृष्ण जन्मभूमी विवादाबाबत त्यांनी सांगितले की या प्रकरणात २२ ऑगस्टला सुनावणी आहे. न्यायालयाने मला बोलावले तर राम जन्मभूमीप्रमाणेच या प्रकरणातही मी संपूर्ण ताकदीने भूमिका मांडीन, असे त्यांनी स्पष्ट केले.

संत समाज आणि युवांना संदेश

महाराजांनी तरुण पिढीला अभ्यासात लक्ष देण्याबरोबरच भारतीय संस्कृतीशी जोडले जाण्याचा संदेश दिला. तसेच सध्याच्या संत समाजाच्या स्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. आजकाल अनेक संत मठ-मंदिरे तर उभारत आहेत, पण ते अध्यात्म व शास्त्र अध्ययनापासून दूर जात आहेत, ही चिंताजनक बाब असल्याचे रामभद्राचार्य महाराज यांनी नमूद केले.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक