
मुंबई: (Maharashtra Rain Updates) मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी गेल्या काही दिवसांपासूनपावसाने थैमान घातले आहे. सलग तिसऱ्या दिवशीही १९ ऑगस्टला पावसाचा जोर कायम आहे. गेल्या २४ तासांत मुंबईसह कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटकाच्या किनारी भागात मुसळधार पावसाची नोंद झाल्याची माहिती आहे. दरम्यान, हवामान विभागाने मंगळवारी देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
सोमवारपासून मुसळधार पाऊस सुरू असून रात्रभर पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दुसऱ्या बाजूला रात्रभर पावसाची रिपरिप चालू असल्यामुळे रेल्वे रुळांमध्ये पाणी साचल्याने मुंबईकरांची लाईफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल रेल्वेसेवा खोळंबली आहे. या पावसामुळे आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईकरांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. आता हवामान विभागाने मंगळवारी१९ ऑगस्ट रोजीही रेड अलर्ट दिला आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज दिवसभर आणि रात्रीही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशात आणि राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार २० ऑगस्टपर्यंत मध्य महाराष्ट्र, मुंबईसह कोकण आणि गोव्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.पुढच्या सात दिवसांमध्ये अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.भारतीय हवामान खात्याच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने दिलेल्या माहितीनुसार १६ ऑगस्ट ते २१ ऑगस्टदरम्यान महाराष्ट्रात अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून ही माहिती देण्यात आलीआहे.
या जिल्ह्यांना रेड अलर्ट
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट