मुंबई : जुलै महिन्यात साजरा होणाऱ्या वन महोत्सव सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे राज्यभरात मुंबईसह सर्व विभागीय मंडळांमध्ये वृक्षारोपण मोहिमेला उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. याअंतर्गत म्हाडाने गृहप्रकल्प परिसरात दोन लाख झाडांची लागवड करण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवले आहे. या झाडांची निगा व देखभालीची जबाबदारी संबंधित गृहनिर्माण संस्थांकडे सोपविण्यात आली आहे. लवकरच जिओ-टॅगिंग प्रणालीद्वारे झाडांची नोंदणी आणि संवर्धन सुनिश्चित करण्यात येणार आहे. हा उपक्रम 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या निर्देशानुसार राबविण्यात येत आहे.
दि.१ जुलै पासून सुरू झालेल्या या वृक्षारोपण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) क्षेत्रात सुमारे ५०,००० झाडे लावण्याचे काम सुरू झाले आहे. मुंबई मंडळातर्फे ५०,००० व कोकण मंडळातर्फे २५,००० झाडे म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या आवारात लावली जात आहेत. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती या विभागीय मंडळांनी प्रत्येकी २५,००० झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
मुंबई मंडळातर्फे विक्रोळीतील कन्नमवार नगर, मालाडमधील मालवणी आणि गोरेगाव येथील प्रकल्पांमध्ये या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. तसेच समुद्र किनारी पर्यावरणाचे संवर्धन करणारी कांदळवन उभारण्याचे नियोजन देखील मंडळातर्फे करण्यात येत आहे. नाशिकमधील चांदवड तालुक्यात जैवविविधता उद्यानात १५,००० झाडे लावण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत उभारण्यात आलेल्या सोलापूर जिल्ह्यातील कुंभारली येथील रे नगर गृहनिर्माण प्रकल्प परिसरात पुणे मंडळातर्फे ९,५०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. तसेच शिरूर येथे उजळाईवाडीतील म्हाडा वसाहतीत सुमारे ६०० झाडे लावण्यात आली.
कोकण मंडळातर्फे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये गृहनिर्माण पुनर्वसन प्रकल्प परिसरात ग्रामस्थांच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले. खोणी, शिरढोण, भंडार्ली, गोठेघर येथील प्रकल्पांमध्येही मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली. नागपूर मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्प परिसरात १,००० झाडांची लागवड सुरू करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील धाराशीव येथे १३ एकर जागेवर सर्वात मोठा वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
'वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. राज्याच्या विकास प्रवासात नवीन घरे उभारणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच पर्यावरणाचा समतोल राखणेही आवश्यक आहे. शहरांच्या विकासाबरोबर सावली देणारी झाडेही वाढली पाहिजे हेच या मोहिमेकरिता 'म्हाडा'चे नवे ब्रीद आहे. या उपक्रमाद्वारे म्हाडा पर्यावरण रक्षणाच्या सामाजिक बांधिलकीलाही अधिक बळकट करत आहे.'