मलजल प्रक्रिया केंद्र (STP) उभारणी कार्यवाही प्रगतिपथावर; दररोज एकूण २ हजार ४६४ दशलक्ष लीटर मलजलावर प्रक्रिया होणार
22-Jul-2025
Total Views |
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील एकूण ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र (STP) उभारण्यात येत असून याद्वारे दररोज एकूण २ हजार ४६४ दशलक्ष लीटर मलजलावर प्रक्रिया केली जाणार आहे. या सातही मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्याची कार्यवाही प्रगतिपथावर असल्याची माहिती उप आयुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल) तथा प्रमुख अभियंता (मुंबई मलनिस्सारण प्रकल्प) राजेश ताम्हाणे यांनी दिली.
मंगळवार, २२ जुलै रोजी वरळी आणि वांद्रे येथील मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पस्थळास प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी भेट देत पाहणी आणि अभ्यास दौरा केला. यावेळी उप प्रमुख अभियंता (मुंबई मलनिस्सारण प्रकल्प) अशोक मेंगडे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते.
यावेळी राजेश ताम्हाणे म्हणाले की, "वरळी, वांद्रे, धारावी, वेसावे (वर्सोवा), मालाड, भांडुप आणि घाटकोपर या ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहेत. या सातही मलजल प्रक्रिया केंद्रांची एकत्रित क्षमता ही दररोज २४६.४० कोटी लीटर अर्थात २ हजार ४६४ दशलक्ष लीटर मलजलावर प्रक्रिया करण्याची आहे. या मलजल प्रक्रिया केंद्रांमुळे फोर्ट, भायखळा, गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड), गावदेवी, हाजीअली, प्रभादेवी, दादर, वरळी, माहीम, वांद्रे, खेरवाडी, वांद्रे - कुर्ला संकुल (बीकेसी), सांताक्रूझ, माटुंगा, वडाळा, शीव-कोळीवाडा, अंधेरी पूर्व, वेसावे, अंधेरी पश्चिम, विलेपार्ले पूर्व, जुहू, विलेपार्ले पश्चिम, ओशिवरा, दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, घाटकोपर, मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुलुंड आदी परिसरातील नागरिकांना फायदा होणार आहे."
प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय स्तरीय प्रक्रिया होणार - अशोक मेंडगे
अशोक मेंगडे म्हणाले की, या प्रकल्पाअंतर्गत प्राथमिक आणि दुय्यम प्रक्रियांसह तृतीय स्तरीय प्रक्रियाही केली जाणार आहे. यासोबतच यातून बाहेर पडणाऱ्या बायोगॅसपासून वीजनिर्मिती देखील केली जाणार आहे. तर बाहेर पडणाऱ्या गाळावर ‘अ’ दर्जाअंतर्गत प्रक्रिया करण्यात येणार आहे. मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पाची स्थापत्यविषयक प्रारंभिक कामे पूर्ण झाल्याने आता पुढील बांधकामाची स्थापत्य कामे वेगाने सुरु झाली आहेत. नवीन प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता आणि सागरी जीवनामध्ये सुधारणा होईल," असे त्यांनी सांगितले.
वरळीमध्ये ५०० दशलक्ष लीटर प्रतिदिन, वांद्रे येथे ३६० दशलक्ष लीटर प्रतिदिन, मालाडमध्ये ४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन, घाटकोपरमध्ये ३३७ दशलक्ष लीटर प्रतिदिन, धारावीमध्ये ४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन, भांडुपमध्ये २१५ दशलक्ष लीटर प्रतिदिन आणि वेसावे (वर्सोवा) येथे १८० दशलक्ष लीटर प्रतिदिन याप्रमाणे एकूण ७ केंद्र उभारणीची कार्यवाही वेगाने सुरू आहे.