मुंबई, " शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील १२ गड-किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा दर्जा मिळणे म्हणजे मराठ्यांचा इतिहासाचा विश्वव्यापी गौरव आहे." असे प्रतिपादन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याला मिळालेल्या १२ गड किल्ल्यांना युनिस्कोने प्रदान केलेल्या जागतिक वारसा मानंकणाच्या निमित्ताने आयोजित कर्तव्यपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते. सदर कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार, सांस्कृतिक विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे पुरातत्त्व खात्याचे तेजस गर्गे फिल्म सिटीच्या स्वाती म्हशे यांची उपस्थिती होती. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की महाराष्ट्राच्या या अमूल्य वारशाचे युनेस्कोने केलेले मानांकन म्हणजे संपूर्ण राष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा विजय आहे. यासाठी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड. शेलार म्हणाले, राज्याच्या दृष्टीने हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेसाठी सर्वस्व अर्पण केले. हे गड-किल्ले फक्त लढाया आणि पराक्रमाची केवळ साक्ष नाहीत, तर जनकल्याणाची प्रेरणास्थळेही आहेत. त्यांनी या कार्यात योगदान दिलेल्या अधिकाऱ्यांचेही कौतुक केले. यापुढेसुद्धा या गड-किल्ले आणि अन्य गड-किल्ल्यांचं पावित्र्य, स्वच्छता, सुशोभीकरण सरकार तर करेलच. जिथे एएसआय (ASI) आहे, तिकडे एएसआय करेल, जिथे पुरातत्व विभाग आहे, तिथे पुरातत्व करेल, पण या १२ गडकिल्ल्यांच्या बाबतीत प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक शिवभक्ताचेही कर्तव्य असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले. सांस्कृतिक विभागाचे अपर मुख्य सचिव खारगे यांनी यावेळी सांगितले की, सर्वांची जबाबदारी ही तेवढीच वाढली आहे .यापुढे गड किल्ल्यांची सुरक्षितेबरोबरच येणाऱ्या पर्यटकांना आणि आपल्या राज्यातील शिवभक्तांना त्यांनी आवाहन केले की, सर्वांनी या १२ गड किल्ल्यांना, भेट द्यावी. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच शाहीर प्रवीण फणसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा सादर केला.