
कल्याण : अंबरनाथ मधील अपघाताच्या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले असतानाच कल्याणात एका खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना चक्क एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून शाळेत ने-आण केली जात आहे. विशेष म्हणजे मुलांच्या सुरक्षिततेसाठी एक ही अटेंडंट (सहाय्यक) सोबत नाही. विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास सुरू असताना आरटीओच्या अधिकाऱ्याचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे अपघात झाल्यानंतरच जाग येणार का असा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.
अंबरनाथमधील एका खाजगी शाळेच्या भरधाव व्हॅनमधून दोन चिमुकली नर्सरीची मुले रस्त्यावर पडली, त्यातील एक गंभीर जखमी झाले. ही हद्रयदावक घटना घडून आठवडा ही उलटलेला नाही तोच कल्याणमध्ये असाच प्रकार समोर आला आहे. कल्याण पूर्व येथील पत्रीपूल परिसरात एका खाजगी शाळेच्या विद्याथ्र्याना एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून शाळेत ने-आण केली जात आहे. या टेम्पोमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणतीही योग्य आसनव्यवस्था नाही. त्याचे दरवाजे ही पूर्णपणे बंद होत नाहीत आणि धक्कादायक म्हणजे मुलांच्या सुरक्षिततेसाठी एकही सहाय्यक नाही. चिमुकले विद्यार्थी केवळ टेम्पोच्या लोखंडी पट्टया धरून उभे आहेत. जर हा टेम्पो भरधाव वेगात असताना थोडासा ही असंतुलित झाला तर निष्पाप मुले थेट रस्त्यावर फेकली जाऊन भीषण अपघात होण्याची शक्यता आहे. अंबरनाथ येथील घटनेनंतर कल्याण आरटीओ ने केवळ काही शाळांना नोटिसा बजावून आपली जबाबदारी झटकली. प्रत्यक्ष कारवाई, अनधिकृत बसेसची तपासणी, दोषीवर परवाने रद्द करण्याची कारवाई यापैकी काहीच केले नाही. त्याच आरटीओ कार्यालयाच्या अवघ्या पाच किलोमीटर परिसरातून विद्यार्थी एका टेम्पोमधून अशा जीवघेण्या पध्दतीने नेले जात आहेत. तरीही आरटीओच्या अधिकाऱ्याच्या डोळ्यात अंजन पडलेले नाही. या यंत्रणेला पुन्हा एकदा आपली जबाबदारी झटकण्याचा सोपा मार्ग सापडला आहे. तक्रार करा मग आम्ही पाहू, अशी आरटीओ अधिकाऱ्याकडून उत्तर दिले जात आहेत. मुलांच्या सुरक्षिततेची आणि अपघातांना प्रतिबंध करण्याची जबाबदारी नेमकी कुणाची आहे ? ही निष्क्रियता आणखी किती बळी घेणार आहे ? असे प्रश्न आता सर्व सामान्य कडून उपस्थित केले जात आहे.