
मुंबई : जल जीवन मिशनमुळे मराठवाड्यातील पाण्याची समस्या दूर होऊन मुबलक पाणी उपलब्ध होणार, असा विश्वास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सोमवार, १४ जुलै रोजी विधापरिषदेत व्यक्त केला.
विधान परिषद सदस्य राजेश राठोड यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य हेमंत पाटील यांनीसुद्धा चर्चेत सहभाग घेतला. यावर उत्तर देताना मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, "मराठवाडा विभागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजना पूर्ण झाल्यानंतर पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध होईल."
"राज्यात प्रत्येक शहरासाठी जल जीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल, नलसे जल’ ही पाणी पुरवठ्याची योजना राबविण्यात येत आहेत. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना या शहरांसाठी सुद्धा या योजनांची कामे सुरू आहेत. मराठवाड्याच्या पाणी समस्येवर उपाययोजना करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा वॉटर ग्रीडचे काम देखील हाती घेतले आहे. या योजनांच्या पूर्ततेनंतर पाण्याची समस्या दूर होईल," असेही मंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.