कल्याण, केडीएमसीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा बौध्दिक स्तर वाढविण्यासाठी, त्यांची शैक्षणिक प्रगती पाहण्यासाठी महापालिकेच्या सर्व शाळांतून विद्यार्थ्यांच्या पायाभूत चाचणीस सोमवारपासून प्रारंभ झाला आहे.
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे निर्देशानुसार शिक्षण विभागाने शिक्षण विभागाच्या अधिकारी व शिक्षकांच्या मदतीने महापालिकेच्या शाळांचा पूर्णत: कायापालट करण्यासाठी कंबर कसली आहे. यावर्षी शाळा प्रवेशा दिवशीच विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके पुरविण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे गणवेश, बुट, दफ्तरे इ. आवश्यक सुविधा देखील वर्षाचे सुरवातीला पुरविण्याचे नियोजन आहे. तसेच महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे आदेशान्वये प्रत्येक शाळानिहाय पालक अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून, या पालक अधिकाऱ्यांनी स्वत: शाळेत जावून, शाळेत घेण्यात आलेल्या पायाभूत चाचणीची पाहणी केली. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पालकत्व स्विकारलेल्या सिंडेकेट येथील ऊर्दु शाळेतील, तसेच बारावे आणि बारदान गल्ली येथील ऊर्दु व मराठी शाळेस समक्ष भेट देवून शाळेत चाललेल्या पायाभूत चाचणी परिक्षेची पाहणी केली. तसेच स्वत: खडू हातात घेवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे दिले. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा बौध्दिक स्तर वाढविण्याच्या दृष्टीकोनातून ही पायाभूत चाचणी घेतली जात असून, यानंतर सर्व शिक्षकांसाठी शिक्षण परिषदेचे आयोजन केले जाणार आहे आणि या शिक्षण परिषदेमध्ये विद्यार्थ्यांचा बौध्दिक स्तर वाढविण्याच्या दृष्टीकोनातून करावयाच्या विविध प्रकारच्या उपायांच्या अंमलबजावणीबाबत ऊहापोह केला जाणार आहे.
यापुढे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचाविण्यासाठी दरमहा पायाभूत चाचणी घेवून, बौध्दिक स्तर वाढविण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जातील. महापालिकेच्या या अभिनव संकल्पनेचे शिक्षकांनी देखील कौतुक केले आहे.