वर्धापन दिन सोहळा सुरु होण्याआधीच मुंबईत उबाठा गटाला खिंडार!

    19-Jun-2025
Total Views |

मुंबई :
शिवसेनेचा ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही पक्षांकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र, त्याआधीच मुंबईत उबाठा गटाला खिंडार पडले आहे. उबाठा गटाच्या मुंबईतील अनेक माजी नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथे या पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मुंबई महानगरपालिकेतील उबाठा गटाचे माजी नगरसेवक आणि विभागप्रमुख अजित भंडारी, माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगरसेविका नादिया शेख आणि मोहसीन शेख यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.


यासोबतच उबाठा गटाचे माजी गोवा राज्यप्रमुख उपेंद्र गावकर, काँग्रेस महासचिव काशिनाथ मयेकर, ५ तालुकाप्रमुख, १ शहरप्रमुख, विभागप्रमुख आणि त्यांचे सहकारी यांनीदेखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तसेच ठाणे शहरातील रामचंद्र नगर शाखा क्रमांक २३ चे उपविभागप्रमुख मोहन चव्हाण, विजय काते, विजय पवार, महादेव कदम, प्रवीण बामणे आणि अनेक गटप्रमुख, उप-शाखाप्रमुख आणि असंख्य कार्यकर्त्यांनीसुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केला. 

...असे आहेत दोन्ही पक्षांचे मेळावे!

गुरुवारी संध्याकाळी ५.०० वरळीतील एन.एस.सी.आय. डोम सभागृहात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तर सायनमधील श्री षण्मुखानंद चंद्रशेखर सरस्वती सभागृहात सायंकाळी ६.०० वाजता उद्धव ठाकरेंच्या पक्षातर्फे वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.