नवी मुंबईत जागतिक थीम पार्कबाबत राज्य शासन सकारात्मक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्जनशील इकोसिस्टम उभारणार

    03-May-2025
Total Views |
 
Devendra Fadanvis
 
मुंबई : नवी मुंबईत जागतिक थीम पार्कबाबत राज्य शासन सकारात्मक असून नवी मुंबईत निर्माण होणाऱ्या तिसऱ्या मुंबईसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, २ मे रोजी केले.
 
जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेमधील भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ (एफआयसीसीआय) यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘स्टुडिओ आणि तंत्रज्ञान’ या विषयावरील राऊंडटेबल बैठकीत ते बोलत होते. या चर्चासत्रात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक, स्टार्टअप्स आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीशी संबंधित प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह, अभिनेते आणि निर्माते अमीर खान, एफआयसीसीआयचे आशिष कुलकर्णी, पी.जयकुमार रेड्डी यांच्या यांच्यासह या क्षेत्रातील तज्ञ मान्यवर उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुंबई हे सर्जनशीलतेचे केंद्र असून माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्राचे स्थान जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्जनशील इकोसिस्टम उभारण्यात येईल. नवी मुंबईत जागतिक थीम पार्कबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. नवी मुंबईत निर्माण होणाऱ्या तिसऱ्या मुंबईसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. याकरिता प्राईम फोकस आणि गोदरेजसोबत दोन महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत, यामुळे मुंबईत जागतिक दर्जाचे स्टुडिओ सुविधा उपलब्ध होणार आहेत," असे त्यांनी सांगितले.
 
ई-स्पोर्ट्ससाठी धोरणात्मक पाठबळ निर्माण करण्यावर भर!
 
ते पुढे म्हणाले की, "आयआयटी मुंबईच्या तांत्रिक सहकार्याने ‘आयआयसीटी’ उभारले जाणार आहे. यामध्ये सर्जनशील उद्योग अभ्यासक्रमात समाविष्ट करून नव्या पिढीला करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच ई-स्पोर्ट्ससाठी धोरणात्मक पाठबळ आणि आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. चित्रपट, वेबसिरीज जाहिरात आणि इतर व्हिज्युअल कंटेंटसाठी चित्रीकरण परवानगी मिळवण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यात आली असून नोंदणी, अर्ज भरणे, शुल्क भरणे, परवाना प्राप्तीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर सात दिवसात परवानगी मिळते," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.