मॅडम भिकाजी कामा : सावरकरांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील विदेशी तलवार

    27-May-2025
Total Views |

hoisting the tricolor flag inspired by Savarkar thoughts at the Stuttgart Conference upporting Savarkar work in London Madam bhikaji Cama contribution is significant
 
 
मॅडम भिकाजी कामा यांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील स्थान एकमेवाद्वितीय आहे. त्यांनी केलेला त्याग, पराक्रम आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी सोसलेल्या हालअपेष्टा यांमुळे त्यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. सावरकरांच्या विचारप्रेरणेतून साकारलेला तिरंगा ध्वज स्टुटगार्ड परिषदेत फडकावण्यापासून ते लंडनमधील सावरकरांच्या कार्याला आर्थिक मदतीपर्यंत, मॅडम कामा यांचे योगदान हे महत्त्वाचे. तेव्हा, विदेशातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ब्रिटिशांविरोधातील लढ्यात तलवारीची भूमिका बजावणार्‍या मॅडम कामा यांच्या क्रांतिकार्याचा आढावा घेणारा हा लेख...
 
मॅडम कामा यांचे माहेरचे नाव भिकाजी पटेल असे होते. त्यांचा जन्म मुंबई येथे दि. 24 सप्टेंबर 1861 रोजी झाला. आई जायजी आणि वडील सोराबजी पटेल. सोराबजी पटेल हे श्रीमंत व्यापारी होते. मॅडम कामांचे प्रारंभिक शिक्षण नेपिअर रोड वरील जे. बी. पेटिट हायस्कुल फॉर-गर्ल्स या शाळेत झाले. मॅडम कामांचे शिक्षण फार झाले नाही, पण त्यांचे लेखन आणि वाचन दांडगे होते. गुजराती, हिंदी, इंग्रजी आणि मराठी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्या उत्तम क्रिकेट खेळाडूदेखील होत्या.
 
वयाच्या 24व्या वर्षी त्यांचा विवाह मुंबईतील प्रसिद्ध सॉलिसिटर रुस्तुम कामा यांच्याशी दि. 3 ऑगस्ट 1885 रोजी पार पडला. रुस्तुम यांचे वडील हे मुंबईतील प्रसिद्ध ‘ओरिएंटल इन्स्टिट्यूट’चे संस्थापक होते. पारंपरिक पारशी संस्कारांत वाढलेल्या मॅडम कामा देशभक्त फिरोज शहा मेहता आणि दादाभाई नौरोजी यांच्या विचारांनी प्रभावित झाल्या होत्या.
 
विवाह झाल्यानंतर काही वर्षांतच त्यांचे पती रुस्तुम कामा यांच्याशी तीव्र मतभेद झाले. त्यानंतर निराश होऊन खचून न जाता, त्यांनी देशसेवेचे व्रत अंगीकारले. 1896 मध्ये मुंबईत प्लेगची साथ बळावली. कित्येक लोकांचा त्यात बळी गेला. मॅडम कामा आणि त्यांच्या अन्य काही महिला सहकार्‍यांनी त्यावेळी रुग्णालयात मानद परिचारिका म्हणून काम केले. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या, “माझ्या गरीब देशबांधवांच्या उद्धाराच्या कार्यासाठी मी स्वतःला वाहून घेतले आहे.” प्लेग हा संसर्गजन्य रोग होता. त्याचा फैलाव अत्यंत वेगाने होत असे. अत्यंत सुस्थितीत असलेल्या कामा यांनी स्वतःला सेवाकार्यात ढकलले. यावरून त्यांची समाजहिताची आणि समर्पणाची वृत्ती लक्षात येते. हे कार्य करीत असताना 1899 मध्ये प्लेगची पुन्हा दुसरी लाट आली. यावेळी मॅडम कामांना प्लेगची लागण झाली. सुदैवाने त्या त्यातून बचावल्या. परंतु, त्यांची प्रकृती मात्र अत्यंत खालावली होती. आपले वडील आणि भाऊ यांच्याकडून काही लक्ष रुपये घेऊन प्रकृती सुधारण्याकरिता त्या सन 1802 मध्ये युरोपला गेल्या. जर्मनी, फ्रान्स आणि स्कॉटलंड येथे प्रत्येकी एक वर्ष राहून त्यांनी उपचार घेतले. 1806 मध्ये त्या लंडनला आल्या. तोवर त्यांची प्रकृतीही नीट झाली होती.
 
त्यावेळी लंडनमध्ये दादाभाई नौरोजी ’लंडन इंडिया सोसायटी’च्या माध्यमातून ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या शोषणाविरुद्ध बैठका घेत असत. कामाबाई या बैठकांना उपस्थित राहू लागल्या. दादाभाईंच्या दोन नाती, पेरिन बेन आणि खुर्शिद बेन यांच्याशी त्यांची मैत्री झाली. दादाभाईंच्या विचारांनी कामाबाई प्रभावित झाल्या.
 
मॅडम कामांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावी असे होते. त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि खणखणीत वक्तृत्व यांमुळे त्या लंडनमधील भारतीय आणि ब्रिटिश नागरिकांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या होत्या. हाईड पार्कच्या प्रख्यात सभास्थानी त्यांची भारतीय स्वातंत्र्यासंबंधी भाषणे गाजू लागली.
 
दि. 1 जुलै 1905 रोजी श्यामजी कृष्ण वर्मांच्या ‘इंडिया हाऊस’च्या वास्तूचे उद्घाटन झाले. त्यावेळी मॅडम कामादेखील उपस्थित होत्या. मॅडम कामा यांनी लंडनमधील भारताचे समर्थन करणारे केरहार्डी, हिडमन यांच्याशी मैत्री साधली. यांतील हेन्री मायर्स हिंडमन हे आंतरराष्ट्रीय समाजवाद्यांच्या जहाल पुरस्कर्त्याशी संबंध असणारे नेते होते. त्यांचा दादाभाई नौरोजी, श्यामजी कृष्णवर्मा, मॅडम कामा, अ‍ॅनी बेझंट इत्यादींसह फ्रेंच आणि जर्मन क्रांतिकारकांशी संपर्क होता. कामाबाईंनी रशियन क्रांतिकारक वेरा फिग्नर आणि क्रोपाटकिन यांच्याशी मैत्री साधली. यांच्या सोबतच भारतीय स्वातंत्र्याचे समर्थक असलेले संपादक टी. स्टेड यांच्याशीही त्यांनी संपर्क साधला. या सर्वांनाच कामांबद्दल अतिशय आदर होता.
 
दि. 26 जून 1906 रोजी विनायक दामोदर सावरकर हे बॅरिस्टरच्या शिक्षणासाठी लंडनला आले. ‘इंडिया हाऊस’मध्ये ते राहू लागले. थोड्याच कालावधीत त्यांनी ‘अभिनव भारता’चे काम सुरू केले. सावरकरांच्या प्रखर बुद्धिवैभवामुळे आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्वामुळे उच्च शिक्षणासाठी लंडनला आलेले आणि ‘इंडिया हाऊस’च्या संपर्कात असलेले अनेक हिंदी युवक सावरकरांच्या संपर्कात आले. त्यात मदनलाल धिंग्रा, ग्यानचंद वर्मा, वामनराव फडके, व्ही. व्ही. एस. अय्यर, लाला हरदयाल, एस. राजन, निरंजन पाल, पांडुरंग महादेव बापट असा अनेकांचा समावेश होता. हे सर्व तेजस्वी तरुण जहाल विचारांचे होते. सावरकरांनी आपल्या लेखणीच्या बळावर आणि वक्तृत्वाच्या साहाय्याने तरुणांची मने पेटवली. मॅडम कामांनी सशस्त्र क्रांतीचे उघड समर्थन केल्याने साहजिकच पोलिसांनी याची नोंद घेतली. पोलिसांनी अनेकदा त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या धमक्यांना कामाबाईनी भीक घातली नाही. त्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना ब्रिटन सोडून जाण्यास सांगितले. आपले स्वातंत्र्य गमावण्यापेक्षा फ्रान्समध्ये राहणे चांगले, असा विचार करून त्या पॅरिस येथे जाऊन राहू लागल्या. पॅरिसला त्यांनी ‘अभिनव भारत’च्या नावावरून ‘न्यू इंडिया सोसायटी’ स्थापन केली. ब्रिटिश सरकारचे दडपशाहीचे धोरण सुरूच होते. मॅडम कामांनी सशस्त्र क्रांती आणि ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारण्यासाठी विदेशात राहून जोरदार आवाज उठवला.
 
पॅरिसला राहात असताना त्यांची जगभरातील समाजवादी क्रांतिकारकांशी मैत्री झाली. त्यात कार्ल मार्क्सचे नातेवाईक आणि रशियन राज्यक्रांतीतील काही धुरिणांचा समावेश होता. 1907 मध्ये स्टुटगार्ड येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवाद्यांच्या परिषदेत मॅडम कामा यांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची जोरदार मागणी केली. भारताच्या स्वातंत्र्याची मागणी करणारे निवेदन आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरकसपणे मांडले जावे, यासाठी सावरकर आणि ‘अभिनव भारत’चे सर्व सहकारी प्रयत्नशील होतेच. सावरकरांच्या कल्पनेनुसार तयार केलेला तिरंगा ध्वज मॅडम कामांनी स्टुटगार्ड परिषदेत फडकवला. भारताच्या स्वातंत्र्याची मागणी कशी रास्त आहे, हे जगापुढे मांडण्यासाठी स्टुटगार्ड परिषद अत्यंत महत्त्वाची ठरली. भारतीयांची भूमिका स्पष्ट आणि परखड शब्दांत मांडण्यात कामा यशस्वी ठरल्या. युरोपप्रमाणेच अमेरिकेचाही पाठिंबा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यास मिळावा, यासाठी मॅडम कामा दि. 19 ऑक्टोबर 1907 रोजी अमेरिकेला गेल्या. आपल्या अमोघ वक्तृत्त्वाने त्यांनी ब्रिटिश सरकारने चालवलेल्या अमानुष दडपशाहीच्या विरोधात प्रचार केला. अमेरिकेतील प्रमुख वृत्तपत्रांतून त्यांचे अनेक लेखही प्रसिद्ध झाले. तसेच त्यांच्या भाषणांनीदेखील खळबळ माजवली. लंडनमधील सावरकरांनी चालवलेल्या सर्व कार्याला मॅडम कामांचा केवळ पाठिंबाच होता असे नाही, तर भरपूर आर्थिक मदतही त्या करीत असत.
 
सावरकरांनी त्यांच्या ‘1857चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथातून ब्रिटिश राजवटीवर अत्यंत दाहक शब्दांत टीका केली. पुस्तक प्रकाशित होण्याआधी पुस्तकावर बंदी आली. पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर केले, पण ते छापावे कुठे, हा प्रश्न होताच. हॉलंडमधील एका मुद्रकाने पुस्तक छापले. पुस्तकाच्या विक्रीची व्यवस्था बर्‍याच प्रमाणात मॅडम कामा यांनी केली. जून 1909 रोजी बाबाराव सावरकर यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. याचा सूड म्हणून मदनलाल धिंग्रांनी सर कर्झन वायली याचा लंडनमध्ये वध केला. धिंग्रांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यावरही मॅडम कामा यांनी लंडनला भेट दिली. मॅडम कामा यांनी त्यांच्या ‘तलवार’ वृत्तपत्रात धिंग्रांच्या कृत्याचे केवळ समर्थनच केले नाही, तर ब्रिटिशांना खणखणीत इशाराही दिला. पॅरिसमधील मॅडम कामा यांचे निवासस्थानदेखील क्रांतिकारकांचे आश्रयस्थान झाले. तेथील अनेक क्रांतिकारकांच्या कार्याला मॅडम कामांनी सहकार्य केले.
 
युरोपमधून पिस्तुले बॉम्ब आणि लिखित साहित्य भारतात पाठवण्याच्या कार्यात मॅडम कामा अग्रेसर होत्या. सावरकरांना ब्रिटिश पोलिसांनी अटक केली. त्यांना भारतात आणले जाणार होते. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी बोटीच्या मार्गाबद्दल गुप्तता बाळगली होती. ‘एस. एस. मोरिया’ या बोटीने दि. 1 जुलै 1910 रोजी इंग्लंडचा किनारा सोडला. मॅडम कामा आणि श्यामजी कृष्णवर्मा यांना खरी माहिती मिळाली होती. बोट मार्सेलिस बंदरातून निघणार त्यावेळी पोर्टहोलमधून उडी घेत पोहत समुद्रकिनारा गाठायचा आणि मॅडम कामा आणि अय्यर यांनी किनार्‍यावरून सावरकरांना पॅरिसमध्ये आश्रयाला आणायचे असा डाव होता, पण ही योजना दुर्दैवाने यशस्वी होऊ शकली नाही. सावरकरांना फ्रान्सच्या स्वाधीन करायला हवे, यासाठी मॅडम कामांनी आपले सर्वस्व पणाला लावले. फ्रान्सच्या भूमीवरून सावरकरांना ब्रिटिश पोलिसांनी अटक करणे, ही आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणारी बाब आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांनी ‘डेली मेल’ या वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्व जगाला ज्ञात होईल, अशा रितीने आपली भूमिका मांडली.
 
मॅडम कामा स्वातंत्र्यवादी जहाल पत्रके प्रसिद्ध करीत. हिंदुस्थानातील दारिद्—य, हालअपेष्टा, इंग्रजांची लुटारू वृत्ती आणि अत्याचारी राजवट संपुष्टात यावी, यासाठी एकत्रितपणे लढा उभारण्याची आवश्यकता त्यांनी विशद केली होती.
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यातील मॅडम भिकाजी कामा यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांची प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि विदेशात राहून त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेले अपार परिश्रम कधीही विसरता येणार नाहीत. त्यांच्या इतके विजनवासाचे दुःख कोणत्याही भारतीय महिलेला सोसावे लागले नाही. क्रांतिकारकांच्या त्या देवता आणि माता होत्या. झाशीची राणी लक्ष्मीबाई प्रमाणेच मॅडम भिकाजी कामा यांचेही नाव भारताच्या इतिहासात अत्यंत आदराने घेतले जाईल, यात शंका नाही.
 
 - डॉ. रमेश जलतारे