पुणे : राज्यभरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने बारामती तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
सोमवार, २६ मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कन्हेरी काटेवाडी येथील कॅनॉल नुकसानग्रस्त परिसराची पाहणी केली. यावेळी कन्हेरी वन, कन्हेरी गाव, पिंपळी, काटेवाडी गाव, ढेकळवाडी इथल्या शेतकऱ्यांशी, गावकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना करण्यासह काही महत्त्वपूर्ण निर्देश दिले.
यासोबतच त्यांनी इंदापूर तालुक्यातील सणसर आणि भवानीनगर येथे नुकसानग्रस्त कॅनॉल आणि अतिवृष्टी ग्रस्त ठिकाणांची पाहणी केली. यादरम्यान शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानुसार अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
सोमवारी सकाळपासून राज्यतील विविध भागांत पावसाचे थैमान सुरु असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांतील नदी आणि नाल्यांना पूर आले आहेत. या पावसामुळे शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतांमध्ये चिखल साचला आहे.