‘नवउद्योजकांना दुबईत उत्पादने निर्यातीसाठी मार्गदर्शन करणार' - मसालाकिंग धनंजय दातार

    15-May-2025
Total Views |

Masala King Dhananjay Datar
 
दुबई: ( Masala King Dhananjay Datar )  “महाराष्ट्रातील नवउद्योजकांची उत्पादने दुबईसह संयुक्त अरब अमिरातीत निर्यात करण्यासाठी आम्ही मदत करू. तसेच दुबईच्या उंबरठ्यावरून जागतिक बाजारपेठेत व्यवसाय वाढवण्यास इच्छुक असलेल्यांना मनापासून मार्गदर्शन करणार आहोत,” असे प्रतिपादन मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी केले.
 
सोलापूर येथील आ. सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने नुकतीच डॉ. धनंजय दातार यांची येथे भेट घेऊन त्यांच्यापुढे सोलापूरच्या शेंगा चटणी, ज्वारीची कडक भाकरी, उत्कृष्ट दर्जाची ज्वारी, तांदूळ व डाळी अशा कृषी उत्पादनांचे सादरीकरण केले. एका बॅग उत्पादकाने नावीन्यपूर्ण पॅकेजिंग सोल्यूशन्सही सादर केली.
 
दातार यांनी या सर्वांच्या गुणवत्तेचे कौतुक केले व काही उत्पादने आपल्या ‘अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्स समूहा’तर्फे खरेदी करण्याची तयारीही दाखवली. भारतातून दुबईत उत्पादने निर्यात करण्यासाठीची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, कायदेशीर तरतुदी, दर्जा व पॅकेजिंगसंबंधी नियम तसेच व्यवसायाचे विपणन करताना घ्यायची काळजी अशा विविध पैलूंवर दातार यांनी या शिष्टमंडळाला मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “भारतातून आखाती देशांत विशेषतः संयुक्त अरब अमिरातीत होणारी निर्यात मुख्यतः सागरी वाहतुकीद्वारे होते, ती स्वस्त असते. याला साधारणतः 20 दिवस लागत असल्याने शेल्फ लाईफ अत्यल्प असलेली नाशवंत उत्पादने विचारात घेऊ नयेत.
 
आम्ही आमच्या सुपर स्टोअर्सच्या साखळीद्वारे आखाती बाजारपेठेत शुद्ध, स्वच्छ व अस्सल उत्पादने पुरवतो. हल्ली सेंद्रिय उत्पादनांवर ग्राहकांचा विशेष भर आहे. उत्पादनांचे पॅकेजिंग सुरक्षित व टॅम्परप्रूफ असावे. आमच्या ‘पिकॉक’ ब्रॅण्डअंतर्गत पौष्टिक खपली गव्हाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नैसर्गिक, रसायनमुक्त, भेसळमुक्त व आरोग्यदायी कृषी उत्पादने पाठवल्यास उत्पादकांनाही समाधानकारक आर्थिक फायदा मिळेल.
  
“मुंबईजवळ पालघर जिल्ह्यात वाढवण हे आंतरराष्ट्रीय बंदर आकाराला येत आहे. पुढील दहा वर्षांत ते संपूर्ण कार्यान्वित होईल. त्यामुळे महाराष्ट्राला मुंबईजवळ ‘जेएनपीटी’ व वाढवण अशी दोन मोठी आंतरराष्ट्रीय बंदरे जागतिक निर्यातीसाठी उपलब्ध असतील. समृद्धी महामार्गाने विदर्भाला मुंबईशी जोडले आहे. अशा प्रस्तावित महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा फायदा वेळेत उठवण्यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे.
 
ज्यांना उत्तम व यशस्वी उद्योजक तथा निर्यातदार बनायचे असेल, त्यांनी आतापासूनच आयात-निर्यात व्यवहारांची माहिती घ्यावी. शक्य असल्यास त्याचा अभ्यासक्रम शिकावा आणि उद्योग उभारून दोन-तीन वर्षांत निर्यात सुरू करावी; म्हणजे अजून दहा वर्षांनी विकसित महाराष्ट्राच्या प्रगतीत तेही सुस्थापित बनून योगदान देऊ शकतील. त्यांना मी जरूर मार्गदर्शन करेन.”