भारताच्या विकासात महाराष्ट्राची सर्वात महत्त्वाची भूमिका! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
01-May-2025
Total Views | 13
मुंबई : भारताच्या विकासामध्ये महाराष्ट्र निरंतर सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडतो आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, १ मे रोजी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह राज्याच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्राकडे भारतातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून पाहिले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणारा महाराष्ट्र निरंतर भारताच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडतो आहे."
महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करणार!
"महाराष्ट्राला सातत्याने पुढे नेण्याचा निर्धार आहे. महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याचा संकल्प आहे. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहचवून सर्वांना सोबत घेऊन विकसित महाराष्ट्र घडवायचा आहे," असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.